आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम निर्देशांकात धाराशिव देशात आठवा

0
18

धाराशिव,दि.06:- आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमांतर्गत नीति आयोगाने देशातील २२ राज्यातून एकूण ११२ जिल्ह्यांची आकांक्षीत जिल्हा म्हणून निवड केली आहे.त्या ११२ जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रातील धाराशिव, नंदुरबार, वाशिम आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा समावेश आहे.आकांक्षीत जिल्हा कार्यक्रम सन २०१८-१९ पासून राबविण्यात येत आहे.पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत निश्चित केलेल्या सहा क्षेत्रातील ४९ निर्देशांकांमध्ये वृद्धी होण्याकरीता जिल्ह्यात विविध योजना / कार्यक्रम / नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.

                    आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमअंतर्गत आरोग्य व पोषण (Health & Nutrition),शिक्षण (Education), कृषी व जलस्त्रोत (Agriculture and Water Resources),आर्थिक समावेशन (Financial Inclusion),कौशल्य विकास (Skill Development) व मुलभूत सुविधा (Basic Infrastructure) आदीं क्षेत्र निश्चित केले आहे.

            नीति आयोगाच्या डॅशबोर्डवर दर महिन्याला मासिक प्रगती अहवाल भरला जातो.केंद्र सरकारकडून दर महिन्याची आकडेवारी प्रसिद्ध केली जाते.त्याअनुषंगाने सध्या ऑक्टोबर महिन्याची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे.जिल्ह्याचा कृषी व जलस्त्रोत क्षेत्रात १० नंबर,शिक्षण क्षेत्रात ४ नंबर व तसेच मुलभूत सुविधा क्षेत्रात ९ नंबर रॅंक आणि आरोग्य व पोषण क्षेत्रात ११ नंबर रँकवर आहे.आपल्या जिल्ह्याची प्रगती होण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन यंत्रणाकडून वारंवार काम करण्यात येत आहे.

            संबंधित क्षेत्रात प्रगती व्हावी याकरिता नेहमी क्षेत्रनिहाय आढावा बैठक घेऊन संबंधित कार्यान्वयीन यंत्रणा यांना कायम सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात येते.तसेच जिल्हा निर्देशांकात वाढ व्हावी याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळेच आज धाराशिव जिल्हा देशात ८ व्या स्थानावावर आलेला आहे.ही बाब खरंच जिल्हा प्रशासनासाठी कौतुकास्पद आहे. जिल्हा कायम प्रगतशील राहावा, यासाठी विविध प्रयत्न केले जातीलच आणि यापुढेही आपली कामगिरी जास्तीत जास्त उंचावण्यासाठी  कायम कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी सांगितले.