38.6 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home Top News RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका;अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले…

RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका;अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले…

0
125

blank

मुंबई:-लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा जिंकता आली. यानंतर अजित पवार गटातील काही नेते आणि आमदार पुन्हा एकदा शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली असून, त्या आता खासदार झाल्या आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा महायुतीत समावेश केल्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकातून ताशेरे ओढत भाजपाच्या कामगिरीवरही टीकास्त्र सोडण्यात आले. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले.

महाराष्ट्र हे अनावश्यक राजकारण टाळता येण्याचे तसेच हेराफेरीचे उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्रात जे घडले ते टाळता आले असते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट भाजपमध्ये सामील झाला. भाजप आणि शिवसेना (शिंदे गटाला) सहज बहुमत मिळाले असते. शरद पवार दोन-तीन वर्षांत गायब झाले असते, कारण चुलत भावांच्या भांडणात राष्ट्रवादीची ताकद संपली असती. हे चुकीचे पाऊल का उचलले गेले? ज्या काँग्रेसी विचारसरणीविरोधात वर्षानुवर्षे लढलो त्यांच्या संघावर टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्याला पायघड्या घालण्यात आल्याने भाजपा समर्थक दुखावले गेले. एका फटक्यात भाजपाने आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केली. महाराष्ट्रात नंबर वन होण्यासाठी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, कोणताही संघर्ष न करता तो आणखी एक राजकीय पक्ष बनला, असे भाष्य करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला बहुमत असताना अजित पवार गटाला सोबत घेण्याची काय गरज होती? असा सवाल करण्यात आला. यावर अजित पवार यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली.

मला फक्त विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष द्यायचे आहे

फक्त विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष द्यायचे आहे. महत्त्वाची कामे कशी मार्गी लागतील, याचा विचार करतो आहे. यासंदर्भात काहीही बोलायचे नाही. निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक जण आपले मत मांडत असतो. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडायचा किंवा भूमिका स्पष्ट करायचा पूर्ण अधिकार आहे. येणाऱ्या विधानसभेत नव्या उमेदीने पुढे जाण्याचा माझा प्रयत्न आहे, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात आल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, हे पूर्णपणे खोटे आहे. छगन भुजबळ नाराज नाहीत, हे त्यांनी सांगितले आहे. तरीही काही जण अशाप्रकारे चुकीच्या गोष्टी पसरवण्याचे काम करत आहे. यात कोणतेही तथ्य नाही.