अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आमदारांचे ‘ईव्हीएम हटवा’ आंदोलन

0
120

नागपूर : ‘ईव्हीएम हटवा, देश वाचवा’, ‘संविधान वाचवा, ईव्हीएम हटवा’, ‘ईव्हीएम सरकार हाय हाय’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारवर हल्ला चढविला.

विधानसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षित निकाल लागल्याची भावना व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी घोळ झाला असल्याची चर्चा होत आहे. अशात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी विरोधकांनी ईव्हीएमविरुद्ध आंदोलन पुकारले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात नाना पटोले, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, महेश सावंत, नितीन राऊत, भास्कर जाधव, भाई जगताप, विकास ठाकरे, अमित देशमुख, सतेज पाटील, अनिल चौधरी, अभिजित वंजारी, संजय मेश्राम, सचिन अहिर, सुधाकर अडबाले, संदीप क्षीरसागर, रोहित पाटील, वरुण सरदेसाई आदींची उपस्थिती होती.


विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ईव्हीएमविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. त्यानंतर विधानभवन परिसरातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, ‘ईव्हीएम हे लोकशाही, राज्यघटनेसाठी घातक आहे. विधानसभा निवडणुकीतील मतदानामध्ये ठिकठिकाणी जो घोळ झाला आहे, त्यावरून आमचा ईव्हीएमविरुद्ध रोष आहे. परिणामत: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवन परिसरात आंदोलन करून ईव्हीएमविरोधी लढाई तीव्र करणार येईल.’

भाई जगतपा म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ईव्हीएम म्हणजे ‘एव्हरी व्होट फॉर महाराष्ट्र’ असे म्हणतात. प्रत्यक्षात ईव्हीएम म्हणजे ‘एव्हरी व्होट फॉर महायुती’ असे आहे. फडणवीस खोटारडे असून मी त्यांना फसवणीस असे नाव देतो.’ईव्हीएम हा लोकशाहीला सर्वात मोठा धोका आहे. निकालात फेरफार करण्यासाठी आणि लोकांची इच्छा दडपण्यासाठी त्यांचा गैरवापर करण्यात आला आहे. सरकार या माध्यमातून लोकशाही मूल्यांचा ऱ्हास करत असून आम्ही हे होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘सध्याचे राज्य सरकार हे ईव्हीएमच्या आधारावर सत्तेत आले आहे.’