घाटकूरोडा घाटावरून रेतीची तस्करी,7 ट्रॅक्टर व 1 जेसीबी जप्त

0
90

चित्रा कापसे/तिरोडा,दि.१५-तालुक्यात रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून याकडे शासन प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सार्वजनिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान होत आहे.12 जून रोजी तिरोडा पोलीस रात्री गस्तीवर असताना  पोलीस निरीक्षक अमित वानखडे यांना घाटकूरोडा येथील वैनगंगा नदीपात्रामध्ये जेसीबीच्या साहाय्याने उपसा करून अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली.माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमित वानखडे हे आपल्या ताफ्यासह सहाय्य्क पोलीस निरीक्षक संजय कवडे, चालक पोलीस शिपाई कोरे, पोलीस हवालदार संजू बांते, पोलीस शिपाई अमित गायकवाड, चालक पोलीस शिपाई टेम्भूर्णीकर, पोलीस शिपाई शैलेश दमाहे, पोलीस शिपाई अंबादे, पोलीस शिपाई पटले, चालक पोलीस शिपाई इलमे सोबत घाटकूरोडा नदी पात्रामध्ये जात असताना त्यांच्या डोळ्यासमोर असलेल्या पांढऱ्या रंगाची शिफ्ट गाडी क्रं. MH 35 AR 7703 गाडी चालक,मालकने ट्रॅक्टर व जेसीबी चालकांना पळण्याचा इशारा दिल्यामुळे ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टर मधील रेती नदी पात्रात खाली करून ट्रॅक्टर घाटकूरोडाचे दिशेने पळविले.पोलीस स्टाफने पाठलाग करून 7 ट्रॅक्टर व 1 जेसीबी पकडले असता ट्रॅक्टर चालकांनी त्यांचे ट्रॅक्टर जागीच ठेऊन घाटकूरोडा शिवारात पळ काढला.त्यांचे ताब्यातील ट्रॅक्टर व जेसीबी पंचांसमक्ष जप्त करुन ४२ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ट्रॅक्टर चालक, मालक तसेच पिवळ्या रंगाची जेसीबीचे चालक मालक व शिफ्ट गाडी क्रं. MH 35 AR 7703 चे चालक व मालकाने अवैधारित्या रेती वाहतूक करण्यास मदत केल्याने त्यांचे विरुद्ध कलम 112,305(ड ) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा नोंद होण्यासाठी शासनातर्फे लेखी फिर्याद पो. शी. अमित परसराम गायकवाड यांनी केली आहे.या रेती घाटावरून मागील अनेक वर्षांपासून अवैध रेती उपसा करून रेती तस्कर रेतीची चोरी मोठ्या प्रमाणात करीत आहेत.नदी पात्राची पाहणी केली असता अंदाजे ४ ते ५ हजार ब्रास रेती उपसा मागील ४-५ महिन्यापासून सुरू असल्याचे दिसून आले. सदर नदी पात्रातून चोरी करून सर्रास टिप्पर द्वारे विक्री करून लाखो रुपयाचा शासनाला फटका बसला.घाटकुरोडा येथील पोलिस पाटील यांनी वरिष्ठांना अवैध रेती चोरी व विक्री होत असल्याचे कधी पत्र व्यवहार केले काय? केले तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय कार्यवाही केली असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहेत.या संपूर्ण गोरखधंद्याची सखोल चौकशी करण्याची मागणीही यानिमित्ताने जनसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे