
पुणे –जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर ( Indrayani river) असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रविवार असल्याने पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी होती. त्यामुळं पूल कोसळल्याची माहिती मिळत आहे. यामुळं अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाले आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये काही लहान मुळे देखील असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या ठिकाणी बचावकार्य सुरु झाले आहे.
प्रत्येक वर्षी पावसाळ्यात कुंडमळा या प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी असते. याठिकाणी असणारा पूल जूना आहे. त्यामुळं पुलाची क्षमता ही कमकुवत झाली होती असे दिसत असल्याची माहिती मिळत आहे. अनेक पर्यटक या भागात फोटो घेत होतो. एकाच वेळी अनेक पर्यटक पुलावर आल्यानं ही दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये 20 ते 25 पर्यटक नदीत वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. नागरिकांनी या परिसरात गर्दी करु नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, सध्या नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरु आहे.
पूल जर धोकादायक असेल तर तो बंद करणं गरजेचं होतं : सुप्रिया सुळे
आता सरकारने तातडीने मदत करणे गरजेचं आहे. प्रशासनाने घटनास्थळी तातडीने जाऊन मदत करावी असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. याबाबत पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी चर्चा केल्याची माहिती सुळे यांनी दिली आहे. प्रशासन पूर्ण सक्रिय झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. पूल जर धोकादायक असेल तर तो बंद करणं गरजेचं होतं असेही सुळे म्हणाल्या. पण आत्ता तातडीने पूर्ण ताकतीने मदत करणे आवश्यक असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.