मराठी भाषा व मराठी संस्कृती नष्ट करण्याचा धर्मांध शक्तींचा डाव उधळून लावा : डॉ. अजित नवले

0
9

सोलापूर,दि.२3 जून-एक राष्ट्र एक भाषा या धोरणाची दादागिरीने अंमलबजावणी करण्याचा भाग म्हणून भाजप महाराष्ट्रावर हिंदी लादण्याचे काम करत आहेत. मराठी भाषा व मराठी संस्कृतीवर हा मोठा हल्ला आहे. भाजप सरकारचे हे महाराष्ट्रद्रोही कृत्य राज्यातील जनता खपवून घेणार नाही, असे प्रतिपादन माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केले. सोलापूर येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला ते संबोधित करत होते.

“देशाच्या सार्वभौमत्वावर गदा आणणाऱ्या, बंधुभाव व मानवतेचे शत्रू असलेल्या, कार्पोरेट भांडवलदार, साम्राज्यवादी शक्ती व धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रवृत्तींना ओळखा आणि त्यांचा बंदोबस्त करा,” असा स्पष्ट संदेश त्यांनी यावेळी दिला.मदुराई राष्ट्रीय अधिवेशनाच्या रिपोर्टिंग निमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. सोलापूर येथील दत्त नगर येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी भूषवले.

कॉ. डॉ. नवले म्हणाले की, २०१४ पासून केंद्रात सत्तारूढ असलेल्या भाजप सरकारने लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या मूल्यांना पायदळी तुडवले आहे. रोजीरोटीसारख्या मूलभूत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष हटवून जातीय व धार्मिक विद्वेष वाढवण्याचे षडयंत्र रचले जात आहे.देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या साम्राज्यवादी अमेरिकेशी सत्ताधाऱ्यांचे वाढते संबंध व अतिरेकी घटनांना खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींना पाठीशी घालण्याचे प्रयत्नही सातधाऱ्यांकडून सुरू आहेत.

पाकिस्तानवर माझे प्रेम आहे असे जाहीर करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या पतप्रधानांचे प्रिय मित्र कसे असू शकतात ? असा सवाल उपस्थित करत भाजप सरकारच्या परराष्ट्रीय धोरणाच्या अपयशाची त्यांनी यावेळी समीक्षा केली.

माकपने राष्ट्रीय पातळीवर राजकीय आणि संघटनात्मक ठरावांद्वारे डाव्या चळवळीसाठी व्यापक आराखडा आखलेला आहे. जाती, धर्माच्या आधारावर निर्माण होणाऱ्या ओळखींऐवजी श्रमाधिष्ठित ओळख रुजवण्याची गरज आहे. हे मूल्य पुनर्स्थापित करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मास लाइन घेत जनसामान्यात अधिक खोलवर काम केले पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी एम एच शेख यांनी प्रास्ताविक केले. युसुफ शेख मेजर यांनी राज्य सचिवांचे सत्कार केले.

या वेळी मंचावर राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. एम.एच. शेख, जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख (मेजर), राज्य समिती सदस्य कॉ. नसीमा शेख, कॉ. नलिनीताई कलबुर्गी, कॉ. अनिल वासम, कॉ. दत्ता चव्हाण, जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉ. शेवंताताई देशमुख, कॉ. सुनंदा बल्ला, कॉ. रंगप्पा मरेड्डी, कॉ. शंकर म्हेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

माकप राष्ट्रीय महाधिवेशनाच्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त झाला असून, देशातील वास्तव बदलण्यासाठी डाव्या चळवळीला व्यापक जनाधार मिळवण्याचे लक्ष्य आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.