
■ महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसचे उपाध्यक्ष तथा गोंदिया जिल्हा प्रभारी अशोक धवड यांची मागणी
देवरी,दि.१७: देवरी तालुक्यातील पुराडा येथे ५ सप्टेंबर २०२५ रोजी आदिवासी समाजातील तीन युवकांचा बोडीच्या पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस चे उपाध्यक्ष तथा गोंदिया जिल्ह्याचे प्रभारी अशोक धवड,महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसचे सचिव तथा आमगाव-देवरी विधानसभा प्रभारी विजय करडकर व कांग्रेसचे देवरी येथील नेते राजकुमार पुराम यांना मिळताच यांनी तातडीने पुराडा येथील सुभाष बैस यांच्या सह मृत्यकांच्या इतर कुटूंबीयांच्या घरी गुरूवार रोजी सांत्वन भेट दिली.
दरम्यान, या घटनेची सखोल तपास करून मृत्यकांच्या कुटूंबीयांना न्याय मिळवून द्या अशी मागणी गावकऱ्यांसह भेट देणाऱ्या शिष्टमंडळाने गोंदियाचे जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
पुराडा येथील पाण्याच्या बोडीत बुडून आदित्य बैस, तुषार राऊत, अभिषेक आचले यांच्या मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले. तरी या घटनेची सखोल तपासणी करून मृतकांच्या कुटूंबीयांना न्याय मिळवून द्या, अशी मागणी भेट देणाऱ्या शिष्टमंडळाने गोंदियाचे जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी न्याय मिळेपर्यंत शांत न बसण्याचा निर्धार या वेळी भेट देणा-या शिष्टमंडळासमोर व्यक्त केला आहे.
या प्रसंगी भेट देणा-या शिष्टमंडळा सोबत मानिकबापु आचले, जागेशर फरदे, सुभाष सरोटे यांच्या सोबत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान काँग्रेस पक्ष मृत्यकांच्या कुटूंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव आपल्या सोबत आहे असे आश्वासन दिले.




