
चंद्रपूर- वनपरिक्षेत्रात दुर्गापुरातील पायली-भटाळी बीटात सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या चिंचोली निवासी ५४ वर्षीय बाबा नारायण गेडाम याला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवीत ठार केले. चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षातील हा ४० वा बळी होता. आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात ३६, बिबट २, अस्वल व हत्तीच्या हल्ल्यात प्रत्येकी एक असे एकूण ४० जणांचा मृत्यू झाला आहे.
चिंचोली गावात राहणारे ५४ वर्षीय बाबा गेडाम हे रोजंदारी मजूर म्हणून कामी करीत होते, सध्या थंडीचे दिवस असल्याने रविवारी सकाळी १० वाजता गेडाम हे सरपण गोळा करण्यासाठी गावातील झुडपी भागातील पायली-भटाळी बीटातील वन कक्ष क्रमांक ८०० मध्ये गेले होते. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने गेडाम यांच्यावर हल्ला करीत त्यांना जंगलाच्या दिशेने फरफटत घेऊन गेला.
गेडाम हे सायकलने जंगलाच्या दिशेने गेले होते, सायंकाळी गेडाम यांचे कुटुंब कामावरून घरी परतले, मात्र वडील घरी न आल्याने कुटुंबाने शोधाशोध सुरु केली, मात्र त्यांचा काही थांगपत्ता लागला नसल्याने गावातील नागरिकांना सोबत घेत जंगलाच्या दिशेने निघाले असता त्यांना गेडाम यांची सायकल व त्याठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले. याबाबत दुर्गापूर पोलिसांना व वनविभागाला नागरिकांनी माहिती दिली.
काही वेळात वनविभाग व पोलिसांची चमू त्याठिकाणी दाखल झाली, गेडाम यांचा शोध घेण्यासाठी सर्वानी जंगलाच्या दिशेने मोर्चा वळविला असता, गेडाम यांची कुऱ्हाड, चप्पल व रक्ताने माखलेले कपडे आढळून आले, तब्बल रात्री ११ वाजता गेडाम यांच्या मृतदेहाचे तुकडे, हाथ त्यानंतर छिन्नविछिन्न अवस्थेत त्यांचा मृतदेहाचा खाल्लेला भाग आढळून आला.





