
गडचिरोली: छत्तीसगडच्या पश्चिम बस्तर विभागातील बिजापूर-दंतेवाडा आंतरजिल्हा सीमेवर ३ डिसेंबर रोजी सकाळपासून सुरु झालेली माओवाद्यांविरोधातील निर्णायक कारवाई संध्याकाळपर्यंत सुरूच राहिली. सलग नऊ तास चाललेल्या भीषण चकमकीत सुरक्षा दलांनी मोठे यश मिळवत १२ माओवाद्यांना ठार केले. मात्र, तीन धैर्यवान डीआरजी जवानांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी या चकमकीत प्राण गमावले.
बिजापूरचे पोलिस अधीक्षक डॉ. जितेंद्र यादव यांच्या माहितीनुसार, बिजापूर व दंतेवाडीतील माओवादविरोधी विशेष पथक (डीआरजी), एसटीएफ, कोब्रा आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त पथकाकडून ३ रोजी पहाटेपासून
सर्च ऑपरेशन राबविण्यात येत होते. सकाळी नऊ वाजताच सीमेवरील घनदाट जंगल पट्टयात माओवाद्यांनी गोळीबार करून जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.
सुरक्षा दलांनी आक्रमक पवित्रा घेत माओवाद्यांच्या दबा धरून बसलेल्या तळांवर जोरदार प्रत्युत्तर केले. अधूनमधून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच होता. घटनास्थळावरून आतापर्यंत सुरुवातीला सात व नंतर पाच असे एकूण १२ माओवादी मृतदेह मिळाले असून, त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तेथे
एसएलआर रायफल्स, काडतुसे, डेटोनेटर आणि अन्य माओवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान बिजापूरच्या डीआरजी पथकातील मोनू वडाडी, दुकारू गोंडे, रमेश सोडी हे तीन जवान शहीद झाले.





