• यंदाही लातूर जिल्ह्यात ‘डीजे मुक्त’ गणेशोत्सव
• बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या ‘डीजे’वर पोलीस गुन्हे दाखल करणार
लातूर, दि. ०५ : शांतताप्रिय आणि सुसंस्कृत जिल्हा अशी लातूरची सर्वत्र ओअख आहे, ही ओळख जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आगामी काळातील सर्व उत्सव सर्व जाती-धर्मीय बांधवांनी एकोप्याने साजरे करावेत. या उत्सवांच्या माध्यमातून सामाजिक एकोपा वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले. दयानंद सहभागृह येथे गोकुळाष्टमी, पोळा व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित लातूर जिल्हा शांतता समिती बैठकीत ते बोलत होते.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा लातूर ग्रामीणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मेघना आय. एन., उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिंह साळवे यांच्यासह पोलीस व जिल्हा प्रशासनातील अधिकारी तसेच लातूर शहर व जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
गतवर्षीप्रमाणे यंदाही लातूर जिल्ह्यात ‘डीजे’मुक्त गणेशोत्सव साजरा होणार असून गणेशोत्सव मंडळानी पारंपारिक वाद्ये, कला प्रकारांना प्राधान्य द्यावे. तसेच गणेश मंडळाकडून उभारण्यात येणाऱ्या देखाव्यांमधून पर्यावरण रक्षण, वृक्षरोपण, जलसंधारणाबाबत जनजागृती करावी. उत्सवाच्या माध्यमातून प्रबोधनाची परंपरा कायम ठेवत इतरांसमोर नवा आदर्श निर्माण करावा. गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांना आवश्यक सर्व परवानग्या एकाच ठिकाणी दिल्या जातील. त्यामुळे आवश्यक परवानगी घेवूनच उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यावेळी म्हणाले.
जिल्ह्याबाहेरील डीजे आणला तर त्यावरही कारवाई करणार : जिल्हा पोलीस अधीक्षक
लातूर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गतवर्षी प्रमाणे यंदाही ‘डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करावा. यंदाही गणेशोत्सवात डीजे व कर्णकर्कश ध्वनिप्रक्षेपण यंत्रणेला परवानगी दिली जाणार नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्ह्याबाहेरील डीजे आणल्यास संबंधित डीजे मालक आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. त्यामुळे गणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा जपत मंडळांनी मिरवणुकांमध्ये लेझीम, ढोल-ताशा, झांज पथक, पारंपरिक वाद्ये, लोककला आणि लोकनृत्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यामुळे उत्सवाला पारंपरिक स्वरूप प्राप्त होण्याबरोबरच स्थानिक कलाकार व कलापथकांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या काळात सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक गणेश मंडळाने आपल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. शक्य असल्यास ही यंत्रणा गणेशोत्सवानंतरही कायमस्वरूपी कार्यरत ठेवावी. पोलीस आणि गणेश मंडळांमध्ये प्रभावी समन्वय राहावा, यासाठी यंदा ‘एक मंडळ–एक पोलीस अंमलदार’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात येणार आहे. प्रत्येक गणेश मंडळासाठी नियुक्त करण्यात येणारा पोलीस अंमलदार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून गर्दी व्यवस्थापन, मिरवणूक नियोजन, सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात आवश्यक मार्गदर्शन करणार आहे. गणेशोत्सव मंडळानी विनापरवानगी मंडप अथवा मिरवणूक काढू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी गणेशोत्सव काळात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी उपस्थितीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही आपल्या सूचना मांडल्या.





