
अॅडिलेड – भारताने विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानसमोर विजयासाठी 301 धावांचे आव्हान ठेवले आहे. त्याचा पाठलाग करण्यापाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्ताननेही सावध सुरुवात केली आहे. शहजाद आणि युनूस खानने पाकिस्तानच्या डावाची सुरुवात केली. मात्र, चौथ्याच षटकात मोहम्मद शमीने युनूसखानला धोनीकरवी झेलबाद केले.कोहलीचे शतक आणि धवन, रैनाच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ही धावसंख्या उभारली आहे. भारत 325 चा टप्पा सहज ओलांडणार असे वाटत असतानाच पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अखेरच्या टप्प्यात अचूक गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना वेसन घातले. त्यामुळे फलंदाजांनी आता त्यांची कामगिरी चोख बजावल्याने गोलंदाजांवर विजयासाठी दबाव असणार आहे.
भारतीय फलंदाजांनी सामन्याची अत्यंत सावध सुरुवात केली. इरफानच्या पहिल्या षटकांत केवळ दोन धावा मिळाल्या. तर त्यानंतर दुसऱ्या षटकातही केवळ तीन धावा मिळाल्या. भारतीय फलंदाज आधी मैदानावर जम बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. चौथ्या षटकात धवनने सामन्यातील पहिला चौकार लगावला तर त्यापाठोपाठ पाचव्या षटकात रोहितनेही चौकार लगावत चांगल्या फलंदाजीचे संकेत दिले. मात्र सोहेलच्या एका चेंडूवर त्याचा फटका चुकला आणि रोहित झेलबाद झाला.
त्यानंतर धवन आणि विराटने टिकून फलंजादी केली. धवनने अर्धशतक पूर्ण केले आहे, तर विराटनेही त्या पाठोपाठ अर्धशतक केले. दोघेही चांगले लयीत असताना झटपट धाव घेण्याच्या प्रयत्नात शिखर धवन 73 धावांवर रन आऊट झाला. दोघांनी 129 धावांची भागीदारी केली. सध्या कोहलीबरोबर रैना मैदानावर आहे. विराट कोहलीने वन डे तील 22 वे शतक पूर्ण केले असून 107 धावांवर तो बाद झाला आहे.
त्यानंतर तडाखेबाज खेळी करणार सुरेश रैना 74 धावांवर बाद झाला. त्यानंतर जडेजा, धोनी आणि रहाणेला बाद करत पाकिस्तानच्या सोहेल खानने हॅटट्रीक घेतली. त्याने भारताचे 4 फलंदाज बाद केले.





