दिशा कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलावणार-गृहमंत्री देशमुख

0
242
file photo

मुंबई,दि.14 : महिलांवरील अत्याचारांना चाप लावण्यासाठी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर 'दिशा' कायदा आणण्यासाठी विधिमंडळाच दोन दिवसांच विशेष अधिवेशन बोलवण्यात येईल,  अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे केली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हे अधिवेशन बोलवण्यात येईल असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.महिला अत्याचारांना चाप लावण्याच्या दृष्टीने, महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासंदर्भातला हा कायदा याच अधिवेशनात आणण्याचे सरकारचे नियोजन होते.मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुदतीपूर्वीच संस्थगित करावे लागत असल्यामुळे या कायद्याचे विधेयक या अधिवेशनात मांडणे शक्य नाही असे अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले. हा कायदा करताना , विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विचार मंथन होणे गरजेचे आहे. त्यामुळे यासाठी अध्यादेश नं आणता दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्यापूर्वी बैठक घेऊन महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या सूचना जाणून घेतल्या जातील असे गृहमंत्री यावेळी म्हणाले.