
नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.14ः– देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राजधानीत लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाचा सोहळा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमिवर दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी फक्त 20 टक्के व्हीव्हीआयपी उपस्थित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे थेट भाषण प्रत्यक्ष ऐकण्याची संधी यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार नाही. तसेच, यावेळी कोरोनामुक्त झालेल्या योद्ध्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण असेल.
स्वातंत्र्य दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण सचिव अजय कुमार आणि एएसआई डायरेक्टर-जनरल यांनी मागील आठवड्यात लाल किल्ल्याला भेट दिली होती. कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग लक्षात घेऊन व्यवस्था करण्यास सांगितले. वृत्तसंस्था एएनआयनुसार, दिल्लीतील स्वातंत्र्य दिन सोहळ्यात यावेळी संपूर्ण बदल होईल. शालेय विद्यार्थी नसतील, मात्र राष्ट्रीय कॅडेट कोर्प्सचे (एनसीसी) कॅडेट्स लाल किल्ल्यातील उत्सवाला उपस्थित राहतील. पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यासाठी किमान 10 हजार प्रेक्षक या कार्यक्रमाला येत होते. पण, यावेळी मात्र ही गर्दी नसेल.
पूर्वीप्रमाणे व्हीव्हीआयपी पाहुणे पंतप्रधानांच्या व्यासपीठाजवळ बसू शकणार नाहीत. पूर्वी जवळपास 900 व्हीव्हीआयपी दोन्ही बाजूंना आसनस्थ होत असत. परंतु यावेळेस त्यांची व्यवस्था थोडी दूरवर असेल आणि फक्त शंभरच्या आसपास व्हीव्हीआयपींना परवानगी असेल. विशेष म्हणजे, यावेळी कोरोनामुक्त झालेल्या योद्ध्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण असेल. त्यात पोलिस आणि देशाच्या विविध भागातील कोरोनामुक्त व्यक्ती असतील





