
नागपूर ,दि.26: टाळेबंदीच्या काळात विमानसह वाहतुकीच्या इतर साधनांवर मर्यादा आल्याने दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने नाशवंत आणि जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा देशभर सुरळीत राहावा म्हणून कोविड पार्सल सेवा आणि विशेष पार्सल सेवा सुरू केली आणि तब्बल ७२२६.०१ टन पार्सलची वाहतूक करून देशात विक्रम केला.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने पार्सल ट्रेनच्या माध्यमातून धान्य आणि जीवनाश्यक वस्तूंचा विक्रमी वाहतूक केली आहे. १ एप्रिल ते २० जुलै दरम्यान ७२२६.०१ टन पार्सलची वाहतूक केली. त्यातून रेल्वेला १ कोटी ६३ लाख रुपयांचा महसूल मिळाला. टाळेबंदी काळात धान्य, औषध, वैद्यकीय उपकरणे, गोडे तेल आदी आवश्यक वस्तूंची देशभर उपलब्ध होण्यासाठी पार्सल ट्रेन चालवण्यात येत आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या तीनही विभागातील महत्त्वाच्या स्थानकावरून देशातील विविध ठिकाणी कोविड-१९ पार्सल स्पेशल आणि विशेष पार्सल ट्रेन सुरू करण्यात आल्यात. इतवारी (नागपूर), गोंदिया, राजनांदगाव, रायपूर, बिलासपूर यासह महत्त्वाच्या स्थानकावरून १ एप्रिल ते २० जुलै दरम्यान ७२२२६.०१ टन पार्सल वाहतूक करण्यात आली. एवढय़ा कालावधीत इतक्या मोठय़ा प्रमाणात पार्सल वाहतूक करण्याचा विक्रम आहे. यातून रेल्वेला पार्सल ट्रेनमधून १ कोटी ६३ लाख ५८ हजार ८४९ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. यामध्ये १८१९.१५ टन फळ आणि दुग्ध पदार्थ, १२५.२ औषधे, ११४.२ टन वैद्यकीय उपकरणे, १२३३.५ टन भाजीपाला, ७३७.३५ टन किराणा साहित्य आणि ३१९६.६७ टन दैनंदिन उपयोगातील इतर वस्तूंचा समावेश आहे. तसेच पपई, बी-बियाणे, ताजी भाजीपाला, दुचाकी, सायकल, कापड, प्लास्टिक बॅग, कपडे, अगरबत्ती, चॉकलेट, मिठाई, सुपारी, मशरूम, पापड, मसाले आदी आहेत. नाशवंत वस्तू अधिक गतीने गंतव्यस्थळी पोहोचवता यावे म्हणून स्वतंत्र सेल तयार करण्यात आला होता. तो चोवीस तास कार्यरत होता, अशी माहिती दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ व्यवस्थापक के.व्ही. रमणा यांनी दिली.





