
पुणे -: राज्यातील आता जुन्या वृक्षांना संरक्षण मिळणार असून, शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून ते ‘हेरिटेज’ म्हणून घोषित करण्यात येणार आहेत. तसेच राज्यात कमी वेळेत ‘घनवन’ तयार करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत घेतला. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकार राज्यात जुन्या वृक्षांची माहिती संकलित केली जात आहे. त्यांची या संदर्भात बैठक झाली.
देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ‘हिरकमहोत्सवा’निमित्त राज्यात ७५ विशेष ‘रोपवाटिकां’ची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवर वनराई तयार करण्यात येणार असून, शासकीय रोपवाटिकेच्या माध्यमातून ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या मदतीने स्वदेशी प्रजातींच्या झाडांच्या लागवड आणि संवर्धनाला चालनाही देण्यात येणार आहे.मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या दालनात ‘सह्याद्री देवराई सामाजिक संस्थे’च्या वृक्षलागवडीसंदभार्तील विविध विषयांवर अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. निसर्गाच्या संवर्धनासाठी राज्यभर वृक्ष लागवड व संवर्धन करण्यात येत असून त्याला चालना देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात वन विभाग आणि महसूल विभागाच्या जागेवर वनराई उभारण्यात येणार आहे. राज्यभर जिल्हानिहाय वृक्षसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.





