Home गुन्हेवार्ता जादूटोण्याच्या संशयातून महिलेसह दोघांना जिवंत जाळले…

जादूटोण्याच्या संशयातून महिलेसह दोघांना जिवंत जाळले…

0

गडचिरोली : १ मे रोजी राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील बार्सेवाडा येथे जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना काही गावकऱ्यांनी मिळून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जमनी तेलामी (५२), देऊ आतलामी (६०) अशी मृतांची नावे असून याप्रकरणी १५ जणांना अटक करण्यात आली आहे. एटापल्ली तालुक्यातील बार्सेवाडा येथील जमनी आणि देऊ हे दोघे जादूटोणा करीत असल्याचा संशय काही गावकऱ्यांना होता. १ मे रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास गावकऱ्यांनी एकत्र येत दोघांना अतिशय निर्दयीपणे मारहाण केली. त्यानंतर मरणासन्न अस्वथेत असलेल्या दोघांना ओढत नेत रात्री १० वाजतादरम्यान गावाबाहेरील नाल्यात पेटवून दिले. दुसऱ्या दिवशी उशीरापर्यंत याविषयी कुणालाच माहिती नव्हती.

दरम्यान, पोलिसांना कुणकुण लागताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवून गुन्ह्याचा उलगडा केला. घटनास्थळी दोघांच्या मृतादेहांचा कोळसा झाला होता. याप्रकरणी गावातील एकूण १५ जणांना अटक करण्यात आली असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आरोपींमध्ये मृत जमनी हीचा नवरा देवाजी तेलामी (६०) व मुलगा दिवाकर तेलामी (२८) यांचा समावेश आहे.

Exit mobile version