
गोंदिया : देवरी येथील औद्योगिक क्षेत्रातील सुफलाम इंडस्ट्रीज लिमिटेड या पशुखाद्य उत्पादक कंपनीतून २.०९ लाख रुपये किमतीचा पशुखाद्य माल ट्रकद्वारे बारामती येथे पाठविण्यात आला होता. मात्र, या मालातील एक भाग खराब झाल्यानंतर ट्रकचालकाने तो माल कंपनीकडे परत न करता अपहार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी देवरी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मेसर्स सुफलाम इंडस्ट्रीज लि. या कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी करण सतीश पांडे (२७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २२ मे २०२५ रोजी सायंकाळी ६:०७ वाजल्यापासून ते १२ जून २०२५ रोजी सकाळी १०:००वाजतापर्यंत कालावधी दरम्यान त्यांनी बारामती अॅग्रो लिमिटेड या कंपनीकडून ३५ हजार ८९० किलो प्राणी खाद्यपूरक मालाची ऑर्डर मिळविली. त्यानंतर माल पोहोचविण्यासाठी आरोपी प्रितम रोडवेज (मालक पी. आर. लिल्हारे) या ट्रान्सपोर्ट कंपनीशी संपर्क साधला. या कंपनीने आरोपी हजरत हसीब खान (रा. नरहरी पट्टी, विश्नाथगंज, जि. प्रतापगढ, उत्तर प्रदेश) या चालकाकडे ट्रक क्रमांक यूटी ७२-सीटी ०९२६ पाठवला. माल २७ मे २०२५ रोजी बारामती येथे पोहोचविण्यात आला, मात्र बारामती अॅग्रो कंपनीने तिथे तपासणी केल्यावर १० हजार ६३० किलो माल पावसामुळे खराब झाल्याचे निदर्शनास आले व तेवढा माल त्यांनी परत पाठविला.
परत पाठविण्यात आलेला माल १५ दिवसांपर्यंत कंपनीकडे परत न आणता,आरोपी हजरत हसीब खान याने मालाचा अपहार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्रितम रोडवेजच्या मालकाशी संपर्क केला असता, त्यांनी कोणताही ठोस प्रतिसाद दिला नाही. मालाच्या बाबतीतही कोणतीही माहिती देण्यात आली नाही. यामुळे पोलिसांनी दोन लाख नऊ हजार ३८९ रुपये किमतीचा माल अपहृत करण्यात आल्याचा ठपका ठेवत दोघांविरोधात बुधवारी (दि.१२) दुपारी ३:२० वाजता देवरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (३), ३ (५) अन्वये फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.