परीक्षा शुल्क भरण्याची मुदत वाढविणार-शिक्षणमंत्री श्री.विनोद तावडे

0
13

दहावी-बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा
मुंबई, दि. 15 : दहावी आणि बारावीच्या सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांसाठी
परीक्षांचे अर्ज भरताना नोटांची अडचण येत असल्यामुळे आता या
विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज आधी भरावा आणि शुल्क नंतर भरावे, अशी
तरतूद करण्यात आली आहे.ज्या विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्याचे शिल्लक
असल्यास अशा विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने
घेतला आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा देण्यापासून कोणताही
विद्यार्थी वंचित राहणार नाही, असे शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे
यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांना
जुन्या नोटांमुळे प्रवेश शुल्क भरताना अनेक अडचणी येत आहेत. याबाबतच्या
काही तक्रारी शिक्षक, पालक, विद्यार्थी संघटनांनी केल्या होत्या, असे
सांगताना श्री. तावडे म्हणाले की, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी
आता प्रथम फॉर्म भरावा आणि नंतर शुल्क भरावे, त्यासाठी या
विद्यार्थ्यांना फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे. त्यामुळे
विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांना चिंता करण्याचे काहीही कारण
नाही, असेही त्यांनी सांगितले.
दहावीच्या परीक्षेला सुमारे 17 लाख तर बारावीच्या परीक्षेला
सुमारे 14 लाख विद्यार्थी यंदा परिक्षेला बसणार आहेत, अशी माहिती देताना
श्री. तावडे म्हणाले की, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क
भरण्याची प्रक्रिया जवळ जवळ संपली आहे. तरीही ज्या वि्दयार्थ्यांनी शुल्क
भरले नाही त्यांनाही  सवलत देण्यात येईल.