
गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.03ःः– आदिवासी विकास विभागा कडून बांधण्यात आलेल्या भव्य अशा एकलव्य निवासी विद्यालयाचा लोकार्पण २ फेब्रुवारीसा आदिवासी विकास व वने तथा गडचिरोली जिल्हा पालकमंत्री अम्बिरशावर आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी सांस्कृतिक नृत्यांनी कार्यक्रमाच्या उत्साहात अधिक भर घातली.यावेळी जनजाती कार्य मंत्रालय, भारत सरकारचे सचिव दिपक खांडेकर, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या सचिव मनिषा वर्मा, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, जि.प.अध्यक्षा योगीताताई भांडेकर, अहेरीच्या नगराध्यक्षा हर्षाताई ठाकरे, समाजकल्याण सभापती माधुरीताई उरेते, नगरसेविका स्मिता येमुलवार, सहा. जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री संबोधित करताना म्हणाले, जिल्ह्यातील शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा मिळावी यासाठी अश्याप्रकारची अत्याधुनिक शाळा उभारून विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत उत्कर्ष साधण्यासोबतच देशाच्या उन्नतीसाठी त्यांना प्रेरित करण्याचा हा एक छोटासा यशस्वी प्रयत्न आहे. स्पर्धेत टिकायचे असेल तर इंग्रजीचे शिक्षण ही काळाची गरज आहे. आदिवासी मुलांनी उच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी बनून आपल्या समाजाचा व जिल्हाचा विकास करावा. याकरिता आदिवासी विकास विभागा मार्फत २४ कोटी रुपये खर्च करुण अहेरी येथे इंग्रजी माध्यमाची निवासी एकलव्य शाळा सुरू करण्याचा माझा मानस आज काही अंशी सफल झाला आहे. कारण आदिवासी दुर्गम भागातील मुलांना दर्जेदार शिक्षणासोबतच त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राज्यातील आदिवासी क्षेत्रांसाठी अश्यापद्धतीच्या अत्याधुनिक २० एकलव्य शाळा निर्माण करणार आहे. जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांकरिता ८० कोटीच्या निधीतून १० वस्तीगृहांचे बांधकाम काही दिवसात पूर्ण होईल. दिल्लीवरून येणारा रुपया-न-रुपया शेवटच्या आदिवासी बांधवापर्यंत पोहोचवितो आहे. याआधी असे कधीही घडून आले नाही त्यामुळेच खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा व आदिवासी बांधवांचा विकास पाहिजे तसा झालेला नाही. केंद्र व राज्य शासन आदिवासी समाजासाठी अनेक कल्याकारी योजना राबवीत आहे. त्याचा लाभ आदिवासी जणतेने घ्यावा अशी इच्छा त्यानी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, जिल्हाच्या विकासासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न चाललेले आहेत. जिल्ह्याच्या विकासाकरिता आतापर्यंत न झालेली कामे आपण कोट्यावधीचा निधी खेचून आणीत पूर्णत्वास आणीत आहोत. शिक्षण, आरोग्य, रस्ते, विज, पाणी, शेती व सिंचन अशा विविध बाबींसाठी मागील ४० वर्षात न झालेली कामे मी प्रत्येक वेळेला पुढाकार घेऊन केली आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी जे करता येईल ते करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्यासाठी निधीची कमतरता कधीही पडू देणार नाही. जिल्ह्याची एकंदरीत भौगोलिक रचना बघता अहेरी जिल्ह्याची निर्मिती होणे अत्यावश्यक आहे. तेव्हा आपल्या सर्वांचे अहेरी जिल्हा निर्मितीचे स्वप्न लवकरच पुर्णत्वास येणार आहे. शासन स्तरावर याचा पाठपुरावा सुरु आहे. येत्या काही दिवसातच अहेरी जिल्ह्याची घोषणा होईल.वेगळा जिल्हा झाला तर विकास अधिक गतीने होईल अश्याप्रकारे पालकमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी तथा साहाय्यक जिल्हाधिकारी डाॅ. इंदूराणी जाखड यांनी केले.