
सातारा –काँग्रेस सरकारच्या काळात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार बाहेर काढले होते. यावरून इंडिया अगेन्स्ट करपशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी अण्णा हजारेंवर निशाणा साधला आहे. हेमंत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे अनेक मुद्यांवर मते मांडली. शेतकरी आंदोलनावरूनही टीका केली आहे. त्यासोबतच त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे.
काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार बाहेर काढणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे भाजपच्या मोदी सरकारच्या काळात इतके भ्रष्टाचार बाहेर निघाले तरी अण्णा हजारे गप्प का आहेत?, असा सवाल हेेमंत पाटील यांनी केला आहे. दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनावरूनही हेमंत पाटील यांनी अण्णांवर निशाणा साधला आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर अंदोलन करु’ असं सांगितलं पण भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी राळेगणसिद्धी येथे भेटुन गेले की अण्णा हजारेंनी भूमिका बदलली. सध्या त्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध काम करायचे नाही वाटते. भाजपच्या काळात होणाऱ्या अफाट भ्रष्टाचारविरोधात आम्ही मैदानात उतरु. मराठा, ओबीसी, धनगर आरक्षण प्रश्नाबाबत आमचा लढा सुरु राहिल, असंही हेमंत पाटील म्हणाले.
दरम्यान, पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. तरीही याविरोधात अण्णा हजारे मौन धारण करून बसले असल्याचं म्हणत पाटील यांनी अण्णांना टोला हाणला आहे.