समागम कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक

0
42

मुंबई,दि.13: श्री गुरु तेग बहादुर साहेब जी यांचा 350 वा शहिद आणि गुरुगोविंद सिंग जी यांचे ३५० वा गुरु ता गद्दी समागम कार्यक्रमाचे आयोजन राज्यात नांदेड नागपूर व मुंबई या तीन ठिकाणी करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत या कार्यक्रमांमधून श्री गुरु तेग बहादुर साहेबजी व गुरुगोविंद सिंगजी  यांचा इतिहास निश्चितच पुढील पर्यंत पोहोचविता येईल, असा विश्वासही  व्यक्त केला.

       वर्षा निवासस्थानी श्री गुरु तेग बहादुर 350 शहीद समागम व गुरु गोविंद सिंग गुरुता गद्दी समागम  कार्यक्रमाच्या आयोजनबाबत  राज्यस्तरीय समितीची बैठक पार पडली. बैठकीस राज्यस्तरीय समितीचे मार्गदर्शक संत ज्ञानी हरनाम सिंहजी खालसा, धर्मगुरू संत श्री बाबूसिह महाराज, संत रघुमुनीजी महाराज, गोपाल चैतन्य जी महाराज, शरद ढोले उपस्थित होते.

       मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,  संघर्ष काळात समाजाचे शोषण होत असताना गुरु तेग बहादूर यांनी समाजासाठी समर्पण केले.  औरंगजेबाच्या जुलमी राजवटीत होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी लढा दिला.  समाजासाठी ते शहीद झाले,  हा इतिहास पुढील पिढीला कळणे अत्यंत आवश्यक आहे. या कार्यक्रमांमधून मागील इतिहास सांगणे हेच अपेक्षित नाही, तर  या पिढीच्या असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव त्यांना करून देण्यात येणार आहे.

      संस्कृती देशाच्या मजबुती करणसाठी लढणाऱ्या लोकांचा हा कार्यक्रम असणार आहे.  वेगवेगळे समाज एकत्र येऊन हा समागम कार्यक्रम होणार आहे या सर्वांच्या एकजुटीतून देश घडविण्याची आणि आपला इतिहास हा समाजाच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याची ही एक संधी असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

      बैठकीतून राज्यस्तरीय समितीच्या समन्वय रामेश्वर नाईक यांनी माहिती दिली. समागमाचे आयोजन नांदेड येथे १५ व १६ नोव्हेंबर, नागपूर येथे ६ डिसेंबर, नवी मुंबई येथे २१ व २२ डिसेंबर २०२५ दरम्यान करण्याचे नियोजन आहे. बैठकीच्या सुरुवातीला मार्गदर्शक संत श्री बाबूसिंहजी महाराज, संत ज्ञानी हरनाम सिंहजी खालसा, शरदराव ढोले यांनीही आपले विचार व्यक्त केले.

       बैठकीला मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ता, नगर विकास विभागाचे  प्रधान सचिव के. गोविंदराज, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, अपर पोलिस महासंचालक निखिल गुप्ता आदी उपस्थित होते.