मुंबई, दि. 12 : संपूर्ण राज्यामध्ये गुढी पाडव्यानंतर प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगवर बंदी आणणार असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले.प्लॅस्टिक कॅरीबॅग बंदी संदर्भात आज मंत्रालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रधान सचिव सतीश गवई,महाराष्ट्र प्रदुषण महामंडळाचे सदस्य सचिव पी. एन. अनबलगन आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री. कदम पुढे म्हणाले, प्लॅस्टिक कॅरीबॅगला पर्याय म्हणून कोणत्या प्रकारच्या पर्यावरणपूरक पिशव्या बाजारात वापरता येतील, या बाबत अनेक संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. तसेच महिला बचतगटांनाही अनुदान देऊन त्यांच्याकडून कापडी पिशव्या घेण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी त्यांना सबसिडी दिली जाईल. टप्प्याटप्याने राज्यातील महानगरपालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनाही प्लॅस्टिकवर बंदी घालण्याबाबत सांगण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांना नाविन्यपूर्ण योजनेसाठी दिलेल्या
निधीतून काही निधी पर्यावरणपूरक गोष्टीसाठी खर्च करण्याबाबत चर्चा करण्यात येईल.प्लॅस्टिक कॅरीबॅग बंदी संदर्भात आकाशवाणी, दूरदर्शन, एफ एम रेडिओ वरुनही प्रसिद्धी करण्यात येईल, असेही श्री.कदम यांनी सांगितले.