
औरंगाबाद, दि.15जानेवारी– डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन हा विद्यापीठाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. जागतिकीकरणाच्या आजच्या काळात विद्यापीठाची नवी ओळख मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केले.
१४ जानेवारी रोजी विद्यापीठाचा नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. यंदा ‘कोविड‘च्या पार्श्वभुमीवर फिजीकल डिस्टन्सिंग ठेऊन हा कार्यक्रम होणार आहे. या विषयी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले, २३ ऑगस्ट १९५८ व १४ जानेवारी १९९४ हे दोन्ही दिवस विद्यापीठाच्या इतिहासात सुर्वणाक्षराने नोंदवून ठेवण्यासारखे आहेत. ‘पिपल्स एज्युकेशन सोसायटी‘ची स्थापना करतांना मराठवाडयासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, अशी भावना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली होती.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. बाबासाहेबांनी औरंगाबाद ही ‘शिक्षाभुमी‘ तर नागपूरला ‘दीक्षाभुमी‘ म्हणून ओळख मिळवून दिली. ही ओळख जपण्याचा तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नावलौकिक उंचावण्याच्या प्रयत्न आगामी काळात करु, असेही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले.