अहमदनगर- जिल्ह्यातील गणेशवाडी येथे ‘दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत’ कार्यान्वित झालेल्या 33/11 के.व्ही. विज उपकेंद्रांच्या उद्घाटन व लोकार्पण सोहळा कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडला.पवार बोलताना म्हणाले रोहित्र जोडणीसाठी शेतकऱ्यांकडुन महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पैसे घेतल्याच्या काही तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. हे मला बिलकुल चालणार नाही आणि मी खपवूनही घेणार नाही. शेतकऱ्यांचे फोन वेळेत घ्या, त्यांना सहकार्य करा, तेही तुम्हाला सहकार्य करतील. नाहीतर माझ्यासारखा विचित्र माणूस कुणी नाही, असे म्हणत आमदार पवार उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांवर संतापले.आता इथले राजकारण बदलेल आणि विकासाच्या राजकारणाकडे सर्वांचा कल राहील. लोकांच्या हितासाठी जातीय राजकारण नाही, तर फक्त विकासाचं राजकारण करायचंय, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास कायगुडे होते. उपसभापती हेमंत मोरे, कल्याण दातीर, बाबुलाल शेख, लालासाहेब कायगुडे, ज्ञानदेव खताळ, शिवाजी ठोंबरे, विजय देवकाते, भिवराज कायगुडे, गणपत कायगुडे, गणेश मराळे, लाला माने, भरत पावणे तसेच महावितरणचे कार्यकारी अभियंता सुरेश कुऱ्हाडे, उपकार्यकारी अभियंता अशोक घुले, चाचणी विभागाचे रोहन धर्माधिकारी आदी उपस्थित होते.पवार पुढे बोलताना म्हणाले की लोकांना विश्वासाने दिलेला शब्द माझ्यासाठी महत्वाचा असतो. लोकांच्या मागणीनुसार मी पाठपुरावा केला. वरिष्ठ नेत्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आणि हे काम मार्गी लागले. शेजारील गावांना या उपकेंद्राचा फायदा होईल. खेड, भांबोरा या उपकेंद्रांवर पडणारा अतिरिक्त भारही कमी होईल.