
– भाजपची जिल्हा विस्तारीत बैठक
गोंदिया :राज्यात हिंदुत्व विचारासाठी सत्ता परिवर्तन झाले आहे. या सरकारने तीस दिवस पुर्ण होण्या आधीच इंधन दर कपात, ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांना प्रोत्साहन अश्या निर्णयासोबतच गणेशोत्सव, दहीहं डी सारख्या सणांचे निर्णय घेतले. हि सरकार तीव्र गतीने काम करणारी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने घर घर तिरंगा हे अभियान राबवायचे आहे. आगामी निवडणुकीत प्रत्येक ग्राम पंचायत व नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. यासाठी सशक्त बुथ यंत्रणा राबवावी, केंद्र सरकारच्या योजना घरोघरी पोहचवाव्यात, पक्षाने दिलेले प्रत्येक कार्यक्रम बूथस्तरावर राबवून कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे प्रतिपादन विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर यांनी केले.
ते तिरोडा येथील ग्रीन लँड गार्डनमध्ये 31 जुलै रोजी आयोजित भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा विस्तारित बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते. जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत प्रामुख्याने खा. सुनिल मेंढे, आ. डॉ. परिणय फुके, आ.विजय रहांगडाले, जिप अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजीमंत्री राजकुमार बडोले, प्रदेश उपाध्यक्ष हेमंत पटले, माजी आ.गोपालदास अग्रवाल, रमेश कुथे, खोमेश रहांगडाले, भेरसिंह नागपुरे, भजनदास वैद्य, भंडारा-गोंदिया संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर, माजी जि प अध्यक्ष नेतराम कटरे, विजय शिवणकर, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, सोनाली देशपांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रचनाताई गहाणे, जि प सभापती संजय टेम्भरे, रुपेश कुथे, जिल्हा महामंत्री संघटन संजय कुलकर्णी, लायकराम भेंडारकर, मदन पटले, सुभाष आकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रास्ताविक करतांना जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांनी हेंद्राबाद येथील राष्ट्रीय कार्यकारिणी व पनवेल येथे झालेल्या प्रदेश कार्यकारिणीची माहिती देत राजकीय, कृषी विषयक आणि ओबीसी राजकीय आरक्षण हे तीन प्रस्ताव मांडले व ते मंजूर करण्यात आले. राजकीय प्रस्ताव मांडताना गेल्या अडीच वर्षात मविआ सरकारने राज्यात केलेल्या अधोगतीवर माहिती दिली तसेच ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळवून दिल्याबद्दल सरकारचे अभिनंदन केले. या प्रसंगी खासदार सुनील मेंढे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन ठराव मांडले व बूथ सशक्तीकरण अभियानाबाबत मार्गदर्शन केले. आ. डॉ परिणय फुके यांनी हि सरकार हिंदुत्व विचारांची असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपा बरोबर आले असल्याचे म्हणाले. राजकीय इच्छाशक्ती नसल्याने महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवले होते ते आपल्या सरकारने आवश्यक कार्यवाही करून परत मिळवले. आता विकासाचा कार्यक्रम धडाक्याने राबवू असे हि ते बोलले. आ. विजय रहांगडाले यांनी आपल्या मार्गदर्शनात महाराष्ट्र सरकारने अल्पावधीत घेतलेल्या निर्णयाबद्दल माहिती दिली. जि प अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबवित असलेल्या कार्यक्रमांतर्गत शुद्ध पेयजल व्यवस्था, प्रत्येक शाळेत शौचालय, १६ गोदाम बांधकाम, आरोग्य व्यवस्था, जनसामान्यांचे दैनंदिन काम सुलभ करणे आदी माहिती दिली. प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. हेमंत पटले यांनी १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट हर घर तिरंगा अभियान राबविण्याबाबत कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. भंडारा-गोंदिया संपर्क प्रमुख वीरेंद्र अंजनकर यांनी पक्षाच्या आगामी मंडळ बैठक व कार्यक्रमाबाबत माहिती देत कोरोनाच्या बूस्टर डोज घेण्यासंदर्भात जनजागृतीबाबत सांगितले. येवेळी नवनियुक्त जि प अध्यक्ष, सभापती, पं स सभापती यांचे सत्कार करण्यात आले. तसेच भाजयुमो मध्ये नवनियुक्त पदाधिकाऱयांची घोषणा करण्यात आली. बैठकीचे संचालन महामंत्री मदन पटले यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.