प्रहार जनशक्ती पक्षाचे १० जुन पासून मागण्या मान्य न झाल्यास अन्नत्याग आंदोलन

0
95

चित्रा कापसे/तिरोडा- शेतकरी, दिव्यांग, भूमिहीन मजूर, माविममधील महिला कर्मचारी, योग शिक्षक यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने १० जूनपासून नवेझरी येथील स्मशानभूमी (मोक्षधाम) येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर करणार आहेत.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे, भूमिहीन मजुरांसाठी पाच लाख रुपये अपघाती विमा सुरक्षा कवच जाहीर करावा, पेरणी ते कापणी पर्यंतची शेतीची कामे नरेगा योजनेअंतर्गत करण्यात यावीत,कोयलारी आश्रमशाळेतील अपघातांची सखोल चौकशी करून पीडित कुटुंबांना पाच लाख रुपयांची
मदत करावी, राखेची वाहतूक करणारे ट्रक, टिप्परांवर कार्यवाही करावी, माविममध्ये काम करणाऱ्या महिला सीआरपी व लेखापालांचे मानधन वाढवावे, जिल्हा परिषद योग शिक्षकांचे मानधन निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, खते, बियाणे, कीटकनाशके, डिझेल, ट्रॅक्टर भाडे, मजुरी यांचे दर वाढले असताना शेतीमालाचे दर मात्र का वाढले नाहीत, याचे उत्तर सरकारने द्यावे, शेतमाल उत्पादन खर्चावर किमान २० टक्के नफा धरून भाव जाहीर करावा, स्वामीनाथन् आयोगाची शिफारस तात्काळ लागू करावी, यासह अन्य मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे.
या आंदोलनात दिव्यांग, भूमिहीन मजूर, माविममधील महिला कर्मचारी, योग शिक्षक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी केले आहे.