
चित्रा कापसे/तिरोडा,दि.१२-शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, महिला आणि युवकांच्या न्याय हक्कासाठी प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू गेल्या पाच दिवसांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीजवळ अन्नत्याग आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनाला जनतेसह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही पाठींबा दिला आहे. तिरोडा तालुक्यातील युवा नेते रविकांत बोपचे यांनी आज आंदोलनस्थळी भेट देऊन बच्चू कडू यांची प्रकृतीची विचारपूस व आंदोलनास ठाम पाठिंबा जाहीर केला.या आंदोलनस्थळी आमदार मा. रोहित पवार, खासदार अमर काळे, आमदार सुनील भुसारा, आमदार प्रकाश गजभिये, सलील देशमुख, ॲड. रविकांत वरपे, पंकजनाना बोराडे, विकास लवांडे यांचीही उपस्थिती होती.
सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत, म्हणूनच बच्चू कडू यांनी थेट अन्नत्यागाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांच्या या आंदोलनाला मोठा लोकसमर्थन मिळत असून सरकारने याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी होत आहे.”शेतकऱ्यांच्या गळ्यातील फास काढण्यापर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, सरकारने वेळेवर निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा भडका उडेल,” असा इशाराही आंदोलनस्थळी देण्यात आला.