माय मेली तरी चालेल पण गाय जिवंत पाहिजे हे आमचे हिंदुत्व नव्हे-उध्दव ठाकरे

हिमंत असेल तर सरकार पाडून दाखवा-ठाकरे गरजले

0
326

गोंदिया,दि.25ः  हे सरकार लवकरच पडेल असेल म्हणणाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधत हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ठेपेला चिटकणारे मुंगळे नाही असे शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले.शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात केवळ 50 जणांच्या उपस्थितीत पार पडला. कोरोना संकटामुळे दरवर्षी दसरा मेळावा शिवाजी पार्कात करण्याची परंपरा खंडीत होत आहे. आज सोशल डिस्टस्टिंगचे सर्व नियम पाळत हा दसरा मेळावा घेण्यात आला,त्यावेळी ते बोलत होते.त्याचवेळी भाजपला चिमटा घेत आरएसएस प्रमुख मोहन भागवतांचे तरी म्हणने एैका असा संदेश देत आमच्या हिंदुत्वावर बोलण्यापेक्षा भागवतांनी आज दिलेल्या हिंदुत्वाच्या भाषणाचा काळ्या टोपी खालील डोक्यात विचार तरी करा असे म्हणाले.माय मेली तरी चालेल पण गाय जिवंत राहिले पाहिजे हे आमचे हिंदुत्व नव्हे,मंदिर सुरु न करण्यावर जे टिका करतात त्यांनी किमान संघाच्या हिंदुत्वाचा अभ्यास करावा अशा खरमरीत भाषेत ठाकरे यांनी भाजपला टोमणे हाणले.

‘अनेक जण तारीख पे तारीख देतात. अनेक जण सरकार पाडण्याचे स्वप्न बघतात. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ठेपेला चिटकणारे मुंगळे नाही. जर वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो हे दाखवल्या शिवाय दाखवणार नाही. मी वाघाची औलाद आहे, त्याला जर डिवचले तर काय होत असते ते इतिहासात दाखले आहे. ‘ असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिला आहे.

 मुंबई हा पाकव्याप्त काश्मीरचा भाग आहे म्हणणार रावण आला आहे, घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचे आणि नमकहरामी करायची. मुंबई पोलीस निकम्मे आहेत, चरस गांजा उघड उघड विकला जातो, असे सगळे चित्र उभे केले गेले. त्यांना सांगतो महाराष्ट्राच्या घराघरात तुळशीचे वृंदावन आहे, गांजाचे नाही, असा टोला ठाकरे यांनी अभिनेत्री कंगना राणौत प्रकरणी लगावला. तसेच मुंबई पोलिसांवर केलेले आरोप मी का खपवून घेऊ, मुंबई पोलिसही माझे कुटुंबीय आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीर आहे, असे बोलणे हा मोदींचा अपमान आहे. कारण त्यांनीच सांगितलेले की पाच वर्षांत पाकव्याप्त काश्मीर भारतात आणू अशी घोषणा केली होती, असा टोलाही त्यांनी हाणला.

 एकाने आत्महत्या केली तो लगेच बिहारचा पूत्र झाला. महाराष्ट्र, पोलीस आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली. ते शेण गप गिळायचे आणि शांत बसायचे, असा इशारा ठाकरे यांनी दिला. तसेच तुमच्या धोतराला गोमूत्र आणि शेणाचा वास येतोय त्याला आम्ही काय करायचे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आम्ही शांत आहोत, पण शंढ नाही. सभ्यतेने वागाल तर आम्हीही तसेच वागू. तलवारीने युद्ध जिंकले जाते, पण ती पकडायला मनगट लागते ते जनतेकडे, शिवसैनिकांकडे आहे, असा इशारा त्यांनी दिला. ज्यांना टक्कर देण्याची खुमखुमी असेल त्यांना जागा दाखवून देणार. संघमुक्त भारत हवे म्हणणारे नितीश कुमार भाजपला कसे चालतात. बिहारमध्ये मोफत लस देताय ती कोणाच्या पैशाने,  मग आम्ही काय बांगलादेशचे? असा सवाल त्यांनी केला. रावसाहेब दानवेंचा बाप दिल्लीत असेल माझा बाप भाडोत्री नाही, आमचे जीएसटीचे पैसे मिळायलाच हवेत. इथं काम करणारी पोरं महाराष्ट्राच्या मातीतली हवी.  आम्ही तुमच्यासारखे ढेपेला चिकटणाऱ्या मुंगळ्यासारखे नाही. वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो हे दाखवू, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी थेट भाजपाला दिले.

एक बेडूक आणि त्याची दोन पोरे, उद्धव ठाकरेंची नारायण राणेंवर टीका
गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे सातत्याने ठाकरे सरकारवर टीका करत असतात. यावरुन आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राणेंवर निशाणा साधला आहे. नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरपुस शब्दात समाचार घेतला. ठाकरे यांनी नारायण राणे यांची तुलना बेडकाशी तुलना केली आहे.

पुढे ठाकरे म्हणाले की, ‘काही जणांना इंजेक्शन द्यावे लागते. काही जणांना तर माणसाचं नाही, तर गुरांचे इंजेक्शन द्यावे लागते. काही जण तर अशी बेडूक आहेत. तुम्हा सर्वांना तर माहिती आहे एक बेडूक आणि त्याची दोन पोरे. या पक्षातून त्या पक्षात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बाबांना सांगितले. बाप आवाज काढतोय पण, आवाज काही’ अशी टीका ठाकरे यांनी केली आहे.