
मुंबई-शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित 10 ठिकाणांवर अंमलबजावणी संचलनालयाने धाड टाकल्या. ईडीच्या या कारवाईमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, लोकशाहीच्या दृष्टीने पाहता ही एक दडपशाहीच आहे. ईडी हे त्यांच्या हातातले बाहुले झाले आहे. अशा शब्दांत भुजबळ यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
भुजबळ म्हणाले की, ‘मी जास्त बोलायला लागलो तर मलाही नोटीस पाठवली होती. एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या काळात शरद पवार साहेबांना ईडीने नोटीस बजावली होती. आता शिवसेना नेते, आमदार प्रताप सरनाईक यांचेही तसेच झाले आहे.’ मात्र, आता जनतेलाही माहित झाले की भाजपविरोधात कुणी बोलले तर त्यांना त्रास देण्यासाठी अशा संस्थांचा वापर होत आहे, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी भाजपचा समाचार घेतला. तसेच ईडीची कारवाई ही ‘ऑपरेशन लोटस’चा भाग असू शकते, असा आरोप देखील छगन भुजबळ यांनी केला आहे.