‘ते’ प्रकरण लव्ह जिहाद नव्हेच:बेपत्ता झालेली मुलगी घरच्यांच्या त्रासाला कंटाळून झाली होती गायब; पोलिस आयुक्तांची माहिती

0
22

अमरावती -येथून बेपत्ता झालेली मुलगी ही घरच्यांच्या त्रासाला कंटाळून रागाच्या भरात पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. सातारा पोलिसांनी मुलीच्या केलेल्या चौकशीनंतर ही बाब समोर आली आहे, अशी माहिती अमरावतीच्या पोलिस आयुक्त आरती सिंह यांनी दिली.

खासदार नवनीत राणा यांनी काल या प्रकरणी अमरावती पोलिसांशी हुज्जत घातली होती. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले आहे. मात्र, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. लव्ह जिहादचे हे प्रकरण नसून मुलगी घरच्यांमुळेच पळून गेली होती, असा जबाब मुलीने सातारा पोलिसांना दिला आहे.

असा लागला शोध

अमरावती पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी याप्रकरणी माहिती दिली. त्या म्हणाल्या, ही तरुणी एकटी रेल्वेने प्रवास करत होती. पुणे रेल्वे पोलिस आणि सातारा पोलिसांशी लोकेशन शेअर केल्यानंतर तरुणीला ताब्यात घेतले. त्यातच अमरावती पोलिस साताऱ्यासाठी रवाना झाले आहेत. तिला घेऊन पोलिस आजच अमरावतीत दाखल होतील.

नेमके प्रकरण काय?

अमरावतीमध्ये राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी 19 वर्षे वयाची तरुणी मंगळवारी रात्री बेपत्ता झाली होती. त्या संदर्भात तरुणीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली होती. खासदार नवनीत राणा आणि भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी हे प्रकरण लव्ह जिहादचे असल्याचा आरोप केलाय. अमरावतीमध्ये लव्ह जिहादचे प्रकार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी थोडा कडक व्यवहार करावा, असे मी अधिकाऱ्यांना सांगण्यासाठी फोन केला. मात्र, त्यांनी आपला फोन रेकॉर्ड केला. पोलिस सहकार्य करत नसल्याचा आरोपही नवनीत राणा यांनी केला होता.

खासदार अनिल बोंडेंचा आरोप

अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील रुग्णवाहिकेवर चालक असणाऱ्या मुस्लिम युवकाने सुशिक्षित हिंदू तरुणीशी लग्न केल्याचा प्रकार खासदार अनिल बोंडे यांनी उघडकीस आणला होता. युवकाने तिला विश्वासात घेत अमरावतीमधील चंद्रविला या ट्रस्टकडून अवैधरित्या लग्न केले. या विवाहसंस्थाला परवानगी नसताना या विवाह संस्थेने बनावट लग्न प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला आहे.