मुंबई,दि.2 – वेगळ्या विदर्भावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत चांगलीच वादावादी होत आहे. त्यामुळे बुधवारी अखंड महाराष्ट्राचा ठराव आणून भाजपला घेरण्याची तयारी युती सरकारमधील शिवसेने केली. त्या अनुषंगाने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत आज (मंगळवार) फोनवरून चर्चा केली. दरम्यान, मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, असे निवेदन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर विरोधकांसह मित्रपक्ष शिवसेनेनेदेखील भाजपाला घेरण्यास सुरुवात केली आहे. आणि आता तर मित्रपक्ष शिवसेनेनं काँग्रेसशी हातमिळवणी करुन भाजापाची कोंडी करण्याचे ठरवल्याचे दिसत आहे. मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करुन चर्चादेखील केली.फोनवर झालेल्या चर्चेनुसार वेगळा विदर्भ विरुद्ध अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे मंत्री थेट काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार असल्याचे ठरले होते. त्यानुसार विधानभवनात रामदास कदम यांच्या दालनात शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची बैठक सुरु आहे. बैठकीत रामदास कदम, सुभाष देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित आहेत.
”राजीनामा मागायचा तुम्हाला अधिकार नाही. मी तुमच्या मेहरबानीवर सत्तेत आलेलो नाही, अखंड महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला निवडून दिले. मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असल्याने माझ्या कामाचे मूल्यमापन राज्याची जनता करेल,” असे प्रतिपादन वेगळ्या विदर्भ राज्याच्या मुद्दयावरून विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जाओ पहले प्रफुल्ल पटेल को पूछ के आओ म्हणत राष्ट्रवादीला ठणकावले
> देशाच्या विकासासाठी छोटी छोटी राज्यं असावी, ही भाजपची भूमिका छुपी नाही. शिवाय शिवसेनेनेही अखंड महाराष्ट्राची भूमिका कधीच सोडलेली नाही, असे स्पष्टीकरण देत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दुतोंडी भूमिकेचाही समाचार घेतला.
> राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी वेगळ्या विदर्भासाठी समर्थन दिले आहे. मग त्याची चर्चा विधानसभेत करायची का? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीची गोची केली.
> शिवाय ‘जाओ पहले प्रफुल्ल पटेल को पूछ के आओ’ म्हणत त्यांनी राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
बेळगाववरून शिवसेना लोकसभेत आक्रमक
> महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभाग केंद्रशासित करावा, अशी मागणी शिवसेनेने आज (मंगळवारी) लोकसभेत केली
> शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मराठीतून भाषण करताना लोकसभेत हा मुद्दा रेटून धरला.