
नवी दिल्ली- देशांतील उच्च न्यायालयांचे तीन न्यायाधीश, न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया,न्यायमूर्ती विजय बिश्नोई आणि न्यायमूर्ती ए.एस.चांदुरकर यांनी आज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने २६ मे २०२५ रोजी झालेल्या बैठकीत उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्याची शिफारस केली होती.२९ मे २०२५ रोजी केंद्राने तीन न्यायाधीशांच्या नियुक्तीला मान्यता दिली.
कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन.व्ही.अंजारिया, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विजय बिश्नोई आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस.चांदुरकर यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी बढतीसाठी शिफारस करण्यात आली होती. भारताचे मुख्य न्यायाधीश बी.आर.गवई यांच्या अध्यक्षते खालील कॉलेजियमने तीन न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्याचा निर्णय घेतला होता.
भारताचे माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती अभय एस.ओक आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या तीन रिक्त पदांसाठी त्यांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती.
न्यायमूर्ती अंजारिया यांनी ऑगस्ट १९८८ मध्ये गुजरात उच्च न्यायालयात वकिली सुरू केली आणि २१ नोव्हेंबर २०११ रोजी त्यांची गुजरात उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि ६ सप्टेंबर २०१३ रोजी ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्यायमूर्ती बिश्नोई यांनी ८ जुलै १९८९ रोजी वकिली सुरू केली आणि राजस्थान उच्च न्यायालय आणि जोधपूर येथील केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात वकिली केली.
८ जानेवारी २०१३ रोजी त्यांची राजस्थान उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि ७ जानेवारी २०१५ रोजी ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले.
न्यायमूर्ती बिश्नोई यांनी ५ फेब्रुवारी २०२४ रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्यायमूर्ती चांदुरकर यांनी जुलै १९८८ मध्ये मुंबईत त्यांची वकिली सुरू केली.त्यानंतर १९९२ मध्ये न्यायमूर्ती चांदुरकर यांनी नागपूरमध्ये वकिली सुरू केली. २१ जून २०१३ रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. या तिघांसह सर्वोच्च न्यायालयात मंजूर न्यायाधीशांची संख्या आता ३४ झाली आहे.