शेततळ्यात बुडून तीन चिमुकल्या भावंडांचा मृत्यू

0
47

बुलढाणा- गाव शिवारातील महादेव मंदिरात देवदर्शनासाठी गेलेल्या तीन सख्ख्या चुलत लहानग्या भावंडांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. विदर्भाला लागून असलेल्या मराठवाड्यातील कोनड बुद्रूक शिवारात मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

यश अनिल जोशी ( १४ ), दीपाली रमण जोशी (०९) व रोहन रमण जोशी (०७) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात येणाऱ्या वरूड बुद्रूक येथील रहिवासी होते. वरूड बुद्रूक येथून पाचशे मीटर अंतरावर कोनड बुद्रूक रस्त्यावरील शेतात अनिल जोशी व रमण जोशी यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. यश व त्याचा चुलत भाऊ रोहन आणि दीपाली हे २ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता ओलांडेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. ते दुपारपर्यंत घरी पोहोचले नाही. मावशीकडे थांबले असतील असा विचार घरच्यांनी केला. रात्री उशिरापर्यंत मुले आली नसल्याने शोधाशोध सुरू झाली.
पोलिसांसह गावकऱ्यांनी रात्रभर डोलखेडा, कोनाड व विदर्भातील शेळगाव आटोळ परिसरात शोध घेण्यात आला. मात्र मुले सापडली नाहीत.
३ जूनला कोनड शिवारातील सुभाष परिहार यांच्या शेतातील शेततळ्यात त्यांचे मृतदेह आढळले. त्यांचे कपडे काठावर असल्याने ते पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जाफराबाद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.