“रेल्वेमंत्री आता बोलायला लागलेत की, पूल प्रशस्त होणार आहेत. हे तुम्हाला आज सुचलं? जिथे जिथे गर्दी होते, तिथले पूल, जिने रुंद करण्यासाठी आपल्याला अक्कल येणार आहे की नाही? एखादी दुर्घटना घडली की, उच्च समिती नेमतात. पण त्या अधिकाऱ्यांना म्हणावं, समिती नेमू नका. तुम्ही त्या जिन्यावरून उतरून दाखवा”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी रेल्वेमंत्र्यांवर निशाणा साधला.“कुणी मागितली बुलेट ट्रेन? मग हा सगळा खटाटोप कोणासाठी? तमाम माता-भगिनींच्या स्वप्नांचा चुराडा करून तुम्ही चांगली स्वप्न बघता. फुकट नागोबा कशाला हा? हे सगळं फुकट मिळते म्हणून हे चाळे सुरू आहेत. ज्या जनतेने निवडून दिले त्यांच्या अपेक्षा पूर्ण करा.”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी बुलेट ट्रेनचा विरोध केला.
भाजपच्या देशातल्या कारभारावर कडवड टीका करताना ते म्हणाले, “देशात सगळीकडेच कारभार बिघडलाय सगळीकडे नुसता चिखल झालाय. असं म्हणतात की चिखलात कमळ उगवतं पण इथं कमळ तर कुठेच दिसत नाही मळ मात्र सगळीकडेच दिसत आहे. पेट्रोलच्या वाढत्या दराबद्दल त्यांनी टीका करून याचे दर उतरवणयची गरज असल्याचे सांगितले.
हिंदू मत फुटू नये यासाठी आमची भाजपशी युती असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. मात्र वंदे मातरम् प्रकरणावरून भाजपला त्यांनी कडक शब्द सुनावले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आम्हाला राष्ट्रपती म्हणून हवे होते याचा त्यांनी पुनरुच्चार केला. मात्र जीएसटी लागू करताना मुंबईच्या उत्पन्नाची हमी दिल्याबद्दल अर्थमंत्री अरुण जेटली यांचे त्यांनी आभार मानले. देशातला भ्रष्टाचार कमी झाला नाही तसेच काळा पैसाहीवबाहेर आला नाही नोटाबंदी पूर्ण फसली, अशी टीका त्यांनी केली.