Home Top News दिल्लीत बेदींचा नव्हे मोदींचाच पराभव – उद्धव ठाकरे

दिल्लीत बेदींचा नव्हे मोदींचाच पराभव – उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. १० – दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे कान टोचले आहेत. दिल्लीतील पराभव हा मोदींचा पराभव आहे या अण्णा हजारे यांच्या मताशी सहमत असल्याचे विधान करत उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला आहे. कोणीही जनतेला गृहीत धऱु नये, जनता अस्वस्थ आहे असे विधानही त्यांनी केले आहे.

मुंबईत मंगळवारी दुपारी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन भाजपाला चिमटे काढले. दिल्लीतील जनतेने आमिषाला बळी न पडता मतदान केले असून आपचा विजय हे लोकशाहीचे कौतुक आहे असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या जनतेकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे असेही त्यांनी नमूद केले. लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते, दिल्लीतील जनतेने त्सुनामी आणली आहे असा खोचक टोलाही त्यांनी भाजपाला लगावला. केजरीवाल यांनी निमंत्रण दिल्यास शपथविधी सोहळ्याला जायचे की नाही यावर विचार करु असेही त्यांनी सांगितले

Exit mobile version