भंडारा दि.22 : भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या मोठ्या पुलाच्या बांधकाम खर्चापेक्षा कितीतरी अधिक पटीने टोल वसूली करण्यात आली आहे. तसेच टोलवसुलीसाठी पुन्हा मुदत वाढविण्यात आली. प्रथमदर्शनी टोलवसूलीचा उपलबध तपशील लक्षात घेता बांधकाम खर्चापेक्षा काही पटीने ही रक्कम जास्त आहे. यासंदर्भात विभागाने फेरलेखातपासणी करावी, असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवनातील दालनात बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
बेकायदेशीररीत्या सुरू असलेली टोलवसुली, भंडारा येथे नादुरूस्त महामार्गामुळे होत असलेली गैरसोय या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांची बैठक आज आयोजीत करण्यात आली. त्याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी हे आदेश दिले. याप्रसंगी वैदयकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अ.अ. सगणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे, उपसचिव राजेंद्र शहाणे, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नवी दिल्लीचे महाव्यवस्थापक तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पुलबांधणीचा कार्यारंभ आदेश 16 नोव्हेंबर,1998 रोजीचा असून 32.57 कोटी निवीदा किंमत होती. सन 2001 पासून पथकर वसुली सुरू होऊन आजपर्यंत 358 कोटी रुपयाची वसुली करण्यात आल्याची बाब उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे. तसेच मुदतवाढीचे प्रकरण आणि विभागाने त्याला दिलेले आव्हान या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा तत्वावरील पथक हक्कासहचे हे प्रकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तर्फे अनुदानित आहे, तर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे त्याची अंमलबजावणी सुरू आहे.
नागपूर-भंडारा महामार्गाची दुरुस्ती : महामार्गावरील नागपूर-भंडारा हा मार्ग सन 2015 मध्ये पूर्ण झाला, मात्र सध्या देखभाल आणि दुरूस्ती अभावी या रस्त्याची तीव्र दुर्दशा झाली आहे. रस्ता खराब असूनही टोल वसुली मात्र सुरूच आहे. ही एक प्रकारे जनतेची लूट असल्याचे सांगत विधानसभा अध्यक्ष, नाना पटोले यांनी संबंधित विभागाच्या वेळ हलगर्जीपणबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ऑक्टोबर अखेरपर्यंत या रस्त्याची दुरूस्ती पूर्ण होऊन रस्ता वाहतुकीस सुयोग्य व्हावा, अन्यथा संबंधित कंत्राटदारांवर कडक कारवाई केली जाईल अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या. त्याचप्रमाणे लातूर शहरालगत जाणारा राष्ट्रीय महामार्ग नगरपालिकेच्या मागणीनुसार 6 कि.मी.च्या उड्डाणपुलासह बांधण्यात यावा, जेणेकरून शहरातील वाहतूक कोंडी टळेल आणि शहरवासीयांच्या सुविधेला प्राधान्य मिळेल, यामुद्दयाकडे वैदयकीय शिक्षणमंत्री यांनी लक्ष वेधले. याबाबत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी उचित कार्यवाही केली जाईल असेही स्पष्ट केले