
अर्जुनी-मोरगाव दि.30 :: शासनाने अतिक्रमणधारकांना त्यांच्या हक्काचे घर आणि कसायला शेती मिळावी यासाठी राज्यातील अतिक्रमण धारकांना मालकी हक्क प्रदान करण्यासाठी 2005 रोजी वन हक्क कायदा तयार केला. या कायद्याअंतर्गत ज्या लोकांचे उपजीविविका, वास्तव्यासाठी वर्षानुवर्षे अतिक्रमण आहे; त्यांना विधीवत पट्टे देण्याची प्रक्रिया सुरू झाली. पंधरा वर्षाचा काळ लोटला मात्र अद्यापही अतिक्रमण धारक या पट्ट्यापासून वंचित आहेत. यामुळे शेतीविषयक, घरकुल, व्यवसायासाठी कर्ज अश्या कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ अतिक्रमणधारकांना घेता येत नाही. लहानलहान तांत्रिक अडचणीमुळे अनेक वर्षापासून पट्टे वाटपाची प्रक्रिया रखडली आहे. या तांत्रिक अडचणी लवकरात लवकर सोडवा व अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप करण्याचे निर्देश आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांना दिले.
उपविभागीय कार्यालयात सोमवार 28 जूनला आमदारांनी यासंदर्भात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार विनोद मेश्राम यांच्याशी चर्चा केली. वन हक्काचे प्रश्न त्वरित मार्गी लावण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या वेळी तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, एफआरटी शहा, आर.के. जांभूळकर, राकेश लंजे, अजय शहारे उपस्थित होते.