
कालीमातीच्या सहाय्यक अभियंत्याचा कारनामा : कातुर्लीचा शेतकरी आला संकटात
गोंदिया,दि.०७- झिरो पोल योजनेंतर्गत कनेक्शन देण्यासाठी महावितरणच्या कालीमाती येथील सहाय्यक अभियंत्याने 15 हजार रुपये जानेवारी 2023 मध्ये घेतले. त्यानंतर प्रतीज्ञापत्र, ऑनलाइन करण्यास सांगितले. महावितरण, महसूलची नाहरकत हे सर्वच करण्यास सांगितले. मात्र अद्यापही ना खांब लागले, ना मीटर असे असतानाही त्या शेतकऱ्याला 16 हजार 390 रुपयांचे बिल देण्यात आले. आता तो सहाय्यक अभियंता ती योजना बंद झाल्याचे सांगून आपले हात झटकत आहे. परिणामी तो शेतकरी संकटात आला आहे.
आमगाव तालुक्यातील कातुर्ली येथील प्रेमलाल अनंतराम बिसेन यांची शेती कातुर्ली या गावात आहे. त्यांना महावितरणच्या एका कर्मचाऱ्याने 2023 मध्ये महाराष्ट्र कृषी धोरण अंतर्गत झिरो पोल योजनेतर्गत शेतात ट्रांसफार्मर लावून मिळते. त्यासाठी महावितरणच्या कार्यालयात संपर्क करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार प्रेमलाल बिसेन यांनी कालीमाती येथील महावितरणच्या उपकेंद्रात जावून सहाय्यक अभियंता अनंत प्रसाद कर यांची यांची भेट घेतली. अनंत कर यांनी त्यांना यासाठी 15 हजार रुपये लागतील असे सांगितले. शेतकरी बिसेन यांनी 15 हजार रुपये सहाय्यक अभियंत्याला जानेवारी 2023 मध्ये दिले. त्यानंतर झिरो डीपी अंतर्गत कनेक्शन मिळेल अशी हमी दिली. त्यासाठी प्रतीज्ञापत्र करून महावितरण आणि महसूल विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले. शेतकऱ्याने तसेच केले. सर्व प्रक्रीया महावितरणच्या पोर्टलवर ऑनलाइन केली. परंतु, ट्रांसफार्मर, खांब आणि मीटर देखील लागले नाही. परिणामी प्रेमलाल बिसेन यांनी पुन्हा कालीमाती कार्यालयात अनंत प्रसाद कर यांची भेट घेतली. आता मात्र सहाय्यक अभियंत्याने ती योजना बंद झाली असे सांगितले. असे असताना मात्र त्या शेतकऱ्याला महावितरणे 16 हजार 390 रुपयांचे बिल धाडले. कसलीही वीज खर्च न करता आणि खांब तसेच मीटर देखील नसताना हातात पडलेले विजेचे बिल बघून त्या शेतकऱ्याच्या पायाखालची वाळू सरकली. सहाय्यक अभियंत्याला दिलेले 15 हजारही गेले, वर्षभरात मारलेले हेलपाटे देखील वाया गेले असताना न वापरलेल्या विजेचे देखील बिल आले. महावितरण शेतकऱ्यांच्या जीवावर उठले की काय? असा सवाल यावरून उपस्थित होत आहे.
उंटावरूनच हाकल्या शेळ्या
कोणत्याही शेतात किंवा घरी विद्युत मीटर बसवायचे असल्यास डिमांड भरण्यापूर्वी आणि त्यानंतर स्थानिक लाईनमनने सर्व्हेक्षण करणे गरजेचे आहे. त्यानंतरच सर्व प्रक्रीया केली जाते. मात्र या प्रकरणात लाईनमन आणि सहाय्यक अभियंत्याने कसलीही सहानिशा न करता डिमांड काढली. आता मीटर कार्यालयात पडून असतानाही शेतकऱ्याला 16 हजारांचे बिल देण्यात आले. हा प्रकार शुद्ध फसवणुकीचाच आहे.
आत्महत्या हाच पर्याय
शेताला सिंचन व्हावे म्हणून शासनाची योजना असल्याने महावितरणच्या कार्यालयाने जे सांगितले ते केले. त्यांना पैसे दिले. सर्व कागदपत्रांची जमवाजमव केली. मात्र वर्ष लोटून मीटर लागले नाही. खांब लागले नसताना पुन्हा 16 हजारांचे बिल देण्यात आले. वारंवार कार्यालयाच्या चकरा मारून गोलगोल फिरविण्यात येत आहे. आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्याला महावितरण जबाबदार राहिल.
प्रेमलाल बिसेन, शेतकरी कातुर्ली
बिल माफ करून देवू
आधी त्यांचा डिमांड काढताना आमची गफलत झाली. कर्मचाऱ्यांनी योग्य माहिती न दिल्याने मीटर देण्यात देण्यात आला. यात आमच्या कार्यालयाची चूक आहे. आता नवीन धोरणांतर्गत त्यांना जोडणी देण्यात येणार आहे. परंतु, डिमांड काढणे बंद आहे. डिमांड सुरू झाल्यावर दुसरी जोडणी देण्यात येईल. त्यांना आलेले बिल माफ करण्यात येईल.
अनंत प्रसाद कर, सहाय्यक अभियंता कालीमाती