महेश येळे
रावणवाडी(गोंदिया)– पोलीस ठाण्याच्या हदीत येणाऱ्या रजेगाव येथे गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासोबत अचानक वीज पडल्याने चार घरांना आग लागल्याची घटना घडली.यावेळी घरात असलेल्या गॅस सिलेंडरचा विस्फोट झाला ज्यामुळे आग वाढली आणि चारही घरे जळून खाक झाली. या घटनेत जीवनलाल कटरे,जनकलाल कुरजेंकर,रुपा बिसेन व शैलेष मेश्राम यांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र चारही घरातील कुटुंबीय लग्न समारंभाकरिता बाहेर गेली असल्याने सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. मात्र, घर जळल्याने घरात असलेली तीन लाख रोख रक्कम देखील जळाली सोबतच ५० लाखांच्यावर नुकसान या आगीने झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे चारही घरातील लोक बेघर झाली आहेत.रात्री उशीरापर्यंत अग्निशमन विभागाच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली.