शेतकऱ्यांनो, नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करा – अनिल पाटील

0
18

कृषी व पौष्टिक तृणधान्य महोत्सव समारोपीय कार्यक्रम

      गोंदिया, दि.18 : भारत हा कृषी प्रधान देश आहे. देशातील बरेचशे नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी अवेळी पाऊस पडतो, यामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान होत असते. त्यामुळे पिकाची कस वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती केली तर नक्कीच उत्पन्नात भर पडेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी आज येथे केले.

         कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया यांचे संयुक्त वतीने दिनांक 13 ते 17 जानेवारी 2024 दरम्यान मोदी मैदान, गोंदिया येथे जिल्हा कृषी व पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन श्री. पाटील बोलत होते. विभागीय कृषि सहसंचालक नागपूर विभाग नागपूर मिलिंद शेंडे, प्रकल्प संचालक आत्मा अजित आडसुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर व उपविभागीय कृषि अधिकारी गोंदिया मंगेश वावधने यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

         अनिल पाटील म्हणाले, सद्यस्थितीत वातावरणीय बदलामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत नवनविन उपक्रम राबवून शेती केली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी नवनविन तंत्रज्ञान विकसित होत आहेत, त्याचा लाभ घेवून शेतकऱ्यांनी शेती केली तर नक्कीच उत्पन्नात वाढ होणार आहे असे सांगून ते पुढे म्हणाले की, सदर पाच दिवशीय कृषी महोत्सवाच्या माध्यमातून विविध विषयावर परिसंवाद, चर्चासत्र, शेतीतील नवनविन प्रयोग, मिश्र पीक पध्दती व एकात्मिक पीक पध्दती, कमी मनुष्यबळावर मात करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणाचा उपयोग, कृषी मालाची प्रक्रिया तसेच शासनाच्या कृषिविषयक विविध योजनांच्या माहितीचे आयोजन करण्यात आले होते. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती कशी करावी याबाबत काही ज्ञान प्राप्त झाले असेलच. सदर माहितीच्या आधारे शेतीमध्ये नाविण्यपूर्ण प्रयोग करुन शेतकऱ्यांनी शेती केली तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल. नागरिकांनी आपल्या रोजच्या आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा, कोदो व सावा इत्यादी तृणधान्याचा समावेश करावा असे त्यांनी यावेळी सांगितले.

          मिलिंद शेंडे म्हणाले, कृषी महोत्सव हा शेतकऱ्यांसाठी नविन दालन उपलब्ध होण्याचे स्थान आहे. गोंदिया हा धान उत्पादक जिल्हा असून सुध्दा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली आहे, त्यामुळे पाण्याची बचत होण्यास मदत होत आहे. शासनाच्या वतीने सेंद्रीय शेतीसाठी पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथे सेंद्रीय शेती प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करण्यावर भर दयावा असे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. सदर पाच दिवशीय कृषी महोत्सवातून शेतकरी निश्चितच काहीतरी सोबत घेवून जावून त्या पध्दतीने शेतकऱ्यांनी शेती करावी असे त्यांनी सांगितले.

         यावेळी कृषी विभागात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषी अधिकारी पवन मेश्राम यांनी केले. कार्यक्रमास सर्व कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील सर्व शेतकरी बांधव, जिल्ह्यातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनी, कृषी प्रक्रिया उद्योजक, महिला बचत गट, उमदेचे बचत गट, नागरिक व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उपस्थितांचे आभार कृषी पर्यवेक्षक गोरेगाव देवेंद्र पारधी यांनी मानले.