कंत्राटदारच्या भष्ट्राचारीवृत्तीमुळे गोरेगाव-ठाणा रस्त्यावरील पुल गायब

0
269

गोंदिया : शासनाकडून बजेट योजनेंतर्गत गोरेगाव ते ठाणा या 12 किमी रस्त्याच्या बांधकामाला गेल्या काही महिन्यांपासून सुरुवात झाली असून लाखो रुपयांचा निधी या बांधकामावर खर्च करण्यात येत आहे. मात्र, संबंधित विभागातील काही अधिकार्‍यांचा कामचुकार व संबंधित कंत्राटदारच्या कामचलाऊ वृत्तीमुळे रस्त्यांचा हा विकास नागरिकांसाठी भकास ठरू पाहत आहे. जिल्ह्यातील गोरेगाव-ठाणा मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून या कामात या मार्गावरील एमसीपी शाळेजवळील जुना पुलच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला असून कंत्राटदाराने पैसे वाचविण्याच्या नादात येथील पुलच बुजवले आहे. त्यामुळे नाल्याच्या पाण्याचा प्रवाह अवरूद्ध झाला असून दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे पाणी रस्त्याच्या एका बाजूला साचले आहे. तर सदर पाण्याची वाट मोकळी न केल्यास येत्या पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह अवरूद्ध होऊन हा पाणी परिसरातील जवळपास 20 ते 25 एकर शेतात शिरण्याची भिती येथील शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे.
संबंधित कंत्राटदारांकडून रस्ता रुंदीकरणाच्या कामात जुन्या पुलाला ( सीडी वर्क) जोडून रुंदीकरण करत असलेल्या ठिकाणी पाईप बसवून नव्याने पुलाचे बांधकाम करणे गरजेचे होते. मात्र, पैसे वाचविण्याच्या नादात कंत्राटदारांकडून पुलाची निर्मिती न करता मुरुम व माती टाकून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पहिल्याच पावसाने या ठिकाणावरील माती वाहून गेली असल्याने रस्त्याच्या कडेवर भलेमोठे भगदाड पडले आहे. मात्र, याची कसलीच माहिती नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.जुन्या पुलाच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेवर मोठे खड्डे पडले असले तरी या ठिकाणीही कसल्याच प्रकारचे फलक लावण्यात आलेले नाही. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता बळावली आहे.