
गोंदिया,दि.२४ः : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील काही गाव नदीकाठी असल्याने त्या भागात गेल्या ३ दिवसापासून सततधार येत असलेल्या पावसामुळे शेतक-यांचे शेतपिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच सततधार पावसामुळे मध्यप्रदेश येथील संजय सरोवर, महाराष्ट्रातील पुजारीटोला व कालीसराळ या धरणाचे पाणी सोडल्याने पाण्याची पातळी वाढली असून वाघनदी व वैनगंगा नदीत पाण्याची पातळी सुद्धा वाढलेली आहे. त्यामुळे नदिकाठील परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.सततच्या पावसामुळे सर्व नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असल्याने लगतच्या शेतक-यांनी रोवलेले धान पिक तसेच इतर पिकाचे नुकसान झाले असून शेतात पाणी साचले आहे. शिवाय अनेक घरांची पडझड झालेली आहे. पाणी शेतामध्ये साचल्याने शेतपिकांचे रोप नष्ट झाले आहे. नुकसान झालेल्या शेतक-यांच्या शेतपिकाचे पंचनामे करणे अत्यंत गरजेचे आहे या करीता आ.विनोद अग्रवाल यांनी पुरग्रस्त क्षेत्राची पाहणी करून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून माहिती सादर करण्याची सुचना तलाठ्यांना दिली.
आ.विनोद अग्रवाल यांनी नदीकाठी असलेले डांगोरली, मरारटोला, कासा, पुजारीटोला, बिरसोला इत्यादि गावांचा दौरा संबधित अधिकारी व कर्मचा-यासह करीत नुकसान झालेले शेतक-यांचे शेतपिकाचे पंचनामे सादर करा व एकही शेतकरी वंचित राहू नये या दृष्टीने काम करावे असे निर्देश दिले.
दरम्यान आ.विनोद अग्रवाल, तहसीलदार शमशेर पठाण, पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले,छत्रपाल तुरकर, रामराज खरे , कौशलबाई छत्रपाल तुरकर सरपंच तेढवा, अनंदा वाढीवा काटी जिप सदस्य, ज्ञानचंद जमईवार, संबधित गावातील तलाठी, देवलाल मात्रे, अनिल मते उपसरपंच, प्रशांत चौहान. बंटी तुरकर, धनीराम अंबुले, तुमन्ने सुरपत खैरवार, रमेश नागफासे, महेश रहांगडाले, आशिफ शेख, रविन्द्र गडपायले, दशरथ पिपरेवार व मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते.