10 जुलेॅला महाधिवेशनाच्या निमित्ताने ओबीसींची पुन्हा बैठक
ओबीसींच्या उत्थानाचा विचार करा
महिला आघाडीच्या प्रतिनिधी म्हणून सुषमा भड तर युवकांचे प्रतिनिधी म्हणून मनोज चव्हाण यांची निवड
नागपूर ,दि.03 : राजकीय नेत्यांवर दबाव टाकायचा असेल तर सर्व ओबीसी संघटनांनी आपआपसातील मतभेद विसरून एकत्रितरीत्या काम करण्याची गरज आहे. ओबीसींच्या जाती आणि त्यातील पोटजातींना विविध मागण्या शासन दरबारी रेटून नेण्यासाठी आवाहन करणार आहोत. अनेकांमध्ये मतभेद आहेत, पण ते आता युवक, विद्यार्थी आणि शासकीय नोकर्या व पदोन्नती मिळविण्यासाठी विसरावे लागेल.७ ऑगस्टला होणारे महाअधिवेशन आणि ओबीसींच्या उत्थानासाठी सर्व जाती आणि पोटजातींनी एकत्रितरीत्या काम करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी येथे केले.
तायवाडे म्हणाले, ओबीसींमध्ये असलेले जातीभेद सर्व संघटनांच्या पदाधिकार्यांनी विसरून विकासासाठी पुढे यावे. राज्यात ओबीसींची लोकसंख्या ५२ टक्के आहे. त्याआधारे राजकीय नेत्यांवर दबाब टाकण्यासाठी आपली एकजूटता दाखवून द्यावी. विद्यार्थ्यांचे शिक्षण असो वा शिष्यवृत्ती, तसेच मंडल आयोगातील विविध शिफारशींच्या अंमलबजावणीची आठवण राज्यकर्त्यांना करून द्यायची आहे. ओबीसींच्या एकत्रीकरणासाठी विदर्भातील ओबीसींचे महाअधिवेशन रविवार, ७ ऑगस्टला धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात होणार आहे. अधिवेशनाच्या यशस्वीतेनंतर नागपुरात होणार्या अधिवेशनात दुसर्या किंवा तिसर्या दिवशी विधिमंडळावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे तायवाडे यांनी सांगितले.तसेच 2018 मध्ये ओबीसीसमाजात जनजागृतीसाठी ओबीसी जनजागृती रथयात्रा काढण्याचे ठरविण्यात आले.या बैठकित विदर्भातील सर्व ओबीसी संघटना व जात पोटजातींच्या संघटनानी एकमताने 7 आॅगस्टचे अधिवेशन हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नावावर यशस्वी करण्याचे ठरविण्यात आले.अधिवेशनासाठी स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य बबनराव तायवाडे यांचीही निवड करण्यात आले.तर अधिवेशनाच्या निमित्ताने महिला प्रतिनिधी म्हणून सुषमा भड तर युवकांचे प्रतिनिधी म्हणून मनोज चव्हाण यांची निवड करण्यात आली.
सचिन राजुरकर म्हणाले, नागपुरात होणारे पहिले महाअधिवेशन सर्व ओबीसी जातींनी एकत्रित येऊन यशस्वी करायचे आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली शिष्यवृत्ती बंद पाडण्याचा शासनाचा डाव संघटनेने उधळून लावला आहे. एकत्रितरीत्या काम केल्यास ओबीसींसाठी असलेल्या मंडळ आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास शासनाला बाध्य करू.
शेषराव येलेकर म्हणाले, महाअधिवेशनाच्या निमित्ताने ओबीसीच्या सर्व जाती व पोटजाती एकत्र येतील.या माध्यमातून विविध सवलती पदरात पाडून घेण्यासाठी शासनावर दबाव आणता येईल. शासनाला ओबीसीची ताकद दाखवून देण्याची हीच वेळ आहे.विविध जिल्ह्यातील संघटनांच्या पदाधिकार्यांनी मत मांडले. ओबीसी सेवा संघ, भंडाराचे अध्यक्ष गोपाल सेलोकर म्हणाले, जातीनिहाय जनगणना आणि ओबीसीच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना दिले आहे.युवा पवार संघाचे कृष्णा देवासे म्हणाले, सर्व संघटनांनी मनातील भीती काढून शासनावर दबाब आणण्यासाठी एकत्र यावे. आरीकर यांनी मत मांडले.संचालन शरद वानखेडे यांनी केले.