
गोंदिया,दि.२९ः स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करुन सुध्दा गोंदिया नगरपालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे.त्यातच ज्या परिसरात नगरपालिकेची प्रशासकीय इमारत आहे,त्याच इमारत परिसरातील सांडपाणी वाहून नेणार्या नाल्याच तुंबलेल्या आहेत.तर शौचालयाच्या परिसरातच केरकचरा फेकल्याचे चित्र बघावयास मिळते.पालिकेच्या कार्यालय परिसरातच सर्वत्र घाणीचे साम्राज्य असताना प्रशासनाकडून जनतेने शहरातील स्वच्छतेची अपेक्षा करणेच चुकीचे म्हणायची वेळ आली आहे.त्यातच गोंदियातील बाजार परिसर असो की,गणेशनगर,सिव्हील लाईन,शिवनगर,कन्हारटोली,रामनगर,गड्डाटोली भागातील नाल्या सांडपाण्याने तुंबलेल्या आहेत.

शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. रस्त्यावरच कचऱ्याचे ढिगारे दिसतात. यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, त्यांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. साचलेल्या या कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. तक्रारी करूनही नगर पालिका लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे.रेल्वेस्टेशन मार्ग,मुख्याधिकारी यांच्या निवासस्थानाकडे जाणार्या कन्हारटोलीतील मुख्य रस्ता,भाजी मार्केट,शहर पोलीस स्टेशनसह शहरातील विविध भागामध्ये कचऱ्याचे ढीग लागल्याचे दिसत आहेत. कचऱ्यामुळे रस्त्यावर बेकायदा डम्पिंग यार्ड बनले आहे. शहरात ठिकठिकाणी घाण पसरली आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने परिसराची दुरवस्था होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.गजानन काॅलनी,पंचायत समिती काॅलनी, लक्ष्मीनगरात गेल्या काही दिवसांपासून कचऱ्यांचे ढीग साचले आहेत.चौकाचौकात लोक कचरा टाकतात. कचरा वेळीच उचलला जात नाही. परिणामी तो कुजतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
