
पारशिवनी : शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्या पत्नीसमोरच हल्ला करून नरडीचा घोट घेतला. ही घटना पारशिवनी वनपरिक्षेत्रांतर्गत (Forest Area) येणाऱ्या देऊरवाडा गावातील शेतात शनिवार, 31 मे रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. रवींद्र कवडूजी काळसर्पे (32), रा. नेऊरवाडा असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतकरी रवींद्र काळसर्पे हे सकाळी पत्नीसह शेतात गेले व बांधावर असलेला कचरा साफ करू लागले. दरम्यान सकाळी 11 वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या नरभक्षी वाघाने रवींद्र यांच्यावर हल्ला चढवित त्यांच्या नरडीचा घोट घेतला. यात रवींद्र जागीच गतप्राण झाले. यावेळी त्यांची पत्नी जवळच काम करीत होती. हा सर्व घटनाक्रम पत्नीच्या डोळ्यादेखत घडला. पत्नीने पतीला नरभक्षी वाघाच्या जबड्यातून सोडविण्यासाठी आरडाओरडा केला, पण सर्व उपाय अपयशी ठरले दुसऱ्या शेतात काम करणारे व गावातील ग्रामस्थ धावत पळत घटनास्थळी आले, पण तोवर नरभक्षी वाघ पळून गेला होता. घटनेची सूचना पारशिवनी पोलिस, वनविभागाचे अधिकारी (Forest Department Officer) व तहसीलदार पारशिवनी यांना सरपंच फजित साहरे यांनी मोबाईलवरून दिली. माहिती मिळताच ठाणेदार राजेशकुमार थोरात आपल्या सहकान्यऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पारशिवनी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले हेसुद्धा आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. या नरभक्षी वाघाने आतापर्यंत चार शेतकऱ्यांचा बळी घेतला तर दोन शेतकऱ्यांना गंभीर जखमी केले आहे.
काही दिवसांपूर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले यांच्या मार्गदर्शनाखाली एका नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाच्या चमूला यश आले होते. त्यामुळे ग्रामस्थांना थोडा दिलासा मिळाला होता. गेल्या काही महिन्यांपासून वाघाने कोणत्याही प्रकारचा कोणताही हल्ला चढवला नसल्याने वाघ पकडण्याच्या मोहिमेकडे दुर्लक्ष झाले. पण आज नरभक्षी वाघाने पुन्हा आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली व पुन्हा एका युवा शेतकऱ्याच्या नरडीचा घोट घेतला. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत वनविभागाने या नरभक्षी वाघाला जेरबंद करायलाच पाहिजे असे सरपंच फजित साहरे यांनी सांगितले.