ग्राहकांशी सुसंवाद साधा, तक्रारी कमी करा – महावितरण संचालक सचिन तालेवार

0
21

नागपूरजून 2025: महावितरणचे संचालक (संचलन तथा प्रकल्प) सचिन तालेवार यांनी ग्राहकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्यावर आणि तक्रारींचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला आहे. दुरुस्ती कामांना उशीर होत असल्यास ग्राहकांना तात्काळ माहिती द्या, त्यांच्याशी सौजन्याने बोला आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन त्यांनी केले. नागपूर परिक्षेत्रातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या पाचही परिमंडळांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

तालेवार म्हणाले, “सुसंवादाने ग्राहकांच्या अनेक समस्या सुटतील आणि तक्रारींचे प्रमाण खूप कमी होईल.” ते पुढे म्हणाले की, दुरुस्ती कामांना विलंब झाल्यास ग्राहकांना लगेच कळवा. शक्य असूनही वीजपुरवठा वेळेत सुरू न झाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल आणि हयगय अजिबात खपवून घेतली जाणार नाही. मोठ्या आणि गंभीर बिघाडांच्या ठिकाणी वरिष्ठ अभियंत्यांनी स्वतः उपस्थित राहून दुरुस्तीच्या कामांना गती द्यावी. तसेच, देखभाल व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे नियोजन असल्यास, त्याचीही पूर्वसूचना ग्राहकांना तात्काळ देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

देखभाल व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद करण्याच्या परवानगीवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देशही तालेवार यांनी दिले. 11 केव्ही वीज वाहिन्यांवरील वीजपुरवठा बंद करण्यासाठी संबंधित अधीक्षक अभियंते आणि 33 केव्ही वाहिनीसाठी मुख्य अभियंत्यांनीच परवानगी द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. औद्योगिक आणि एमआयडीसी भागात केवळ नवीन वीजजोडणी द्यायची आहे म्हणून वीजपुरवठा कधीही बंद करुन इतर औद्योगिक ग्राहकांचे नुकसान करु नका.. अशा जोडण्या आणि देखभाल व दुरुस्तीची कामे निश्चित केलेल्या दिवशीच करा आणि त्याची पूर्वसूचना सर्व ग्राहकांना द्या, असेही त्यांनी सांगितले. तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची महावितरणच्या सॉफ्टवेअरमध्ये नोंद करून ग्राहकांना एसएमएसद्वारे त्वरित सूचना पाठवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

महावितरणच्या सेवा अधिक ग्राहकोभिमुख करण्यावर तालेवार यांनी भर दिला. वीज ग्राहकांच्या नावात बदल करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी असतानाही कर्मचाऱ्यांनी ती क्लिष्ट करून ठेवल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ग्राहकांना त्रास न देता ही प्रक्रिया सहज करा, असे आवाहन त्यांनी केले.

स्मार्ट मीटर लागल्यानंतर वीजपुरवठा विश्वासार्हता अंकेक्षण थेट ग्राहक स्तरावर होणार असल्याने त्याचा ग्राहकांना मोठा फायदा होईल. यामुळे त्यांना मिळणाऱ्या वीजपुरवठ्याच्या गुणवत्तेत सुधारणा होईल, तसेच रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) आणि ब्रेकर्सच्या किरकोळ दुरुस्त्या आपापल्या पातळीवर करण्याच्या सूचनाही सचिन तालेवार यांनी यावेळी दिल्या. थकबाकीदार ग्राहकांकडून वसुली करणे किंवा त्यांचा वीजपुरवठा खंडित करणे हे दोनच पर्याय उपलब्ध असल्याने, वीज बिलापोटी असलेली थकबाकी पूर्णपणे वसूल करा किंवा ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करून त्याची नोंद प्रणालीमध्ये करा, असे स्पष्ट निर्देश तालेवार यांनी दिले. यावेळी त्यांनी मागेल त्याला सौर कृषीपंप, सुअभ्रग्राम, मॉडेल सौर व्हिलेज, आरडीएसएस, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी आदी योजनांच्या कामांची माहिती घेत आवश्यक त्या सूचना केल्या.

या महत्त्वपूर्ण बैठकीला गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे दिलीप दोडके, चंद्रपूर परिमंडलाचे हरिश गजबे, अमरावती परिमंडलाचे अशोक साळुंके यांच्यासह पाचही परिमंडळातील अधीक्षक अभियंते, नागपूर परिमंडळातील कार्यकारी अभियंते व नागपूर शहर मंडलातील उपविभागीय अभियंते उपस्थित होते.