
वाशिम,दि.5 जुन-संत परंपरेतील श्रद्धेचा आणि समर्पणाचा प्रतीक असलेला पालखी सोहळा दरवर्षी मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. हजारो वारकरी आणि भक्तांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील प्रशासनाने पालखी पदयात्रा नियोजन २०२५ साठी संपूर्ण यंत्रणा सज्ज राहुन समन्वयाने काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी आज दि.४ जुन रोजी वाकाटक सभागृहात आयोजित बैठकीत दिले. नियोजनबद्ध मार्गक्रमण, सुरक्षितता, आरोग्य, वाहतूक आणि निवास व्यवस्थेसह विविध विभागांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या असून यंत्रणांनी याबाबत गांभीर्याने पाहिले पाहिजे.
जिल्ह्यातुन ८ ते १२ जुन श्री.संत गजानन महाराज पालखी, श्री. विठ्ठल रुक्मिणी संस्थान , श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथुन ७ ते १४ जुन , श्री स्वामी समर्थ पालखी ५ ते ६ जुन तसेच श्री.संत वासुदेव महाराज, ज्ञानपीठ संस्था अकोट पालखी १४ ते १६ जुन दरम्यान मार्गक्रमण करणार आहे.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी पालखी मार्गातील सर्व ग्रामपंचायतींनी स्वच्छतेस प्राधान्य द्यावे.आरोग्य तपासणी शिबिरे वेळेवर पार पडावीत आणि आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा.पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत असावी आणि वाहतूक व्यवस्थेत अडथळा येऊ नये यासाठी पोलीस विभागाने नियोजनबद्ध बंदोबस्त ठेवावा.अश्या सुचना यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
प्रत्येक मुक्कामी पालखीचे स्वागत आणि व्यवस्था सुव्यवस्थित व्हावी यासाठी स्थानिक यंत्रणांनी समन्वय साधावा.असेही त्यांनी यावेळी सांगितले. दिंडीकरीता ट्रॅफिक कंट्रोल पथक नेमावे, रस्ते स्वच्छता पाणी व्यवस्थित पिण्याचे पाणी ठेवावे, वीज व्यवस्थेसाठी लाईनमन नेमावे,आरोग्य विभागाला रुग्णवाहिका सज्ज ठेवणे, औषध साठा राखणे, आरोग्य पथके तैनात ठेवणे व जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले.
या नियोजन बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, मंगरूळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र देवरे, वाशिम तहसीलदार निलेश पळसकर, मानोरा तहसीलदार संतोष यावलीकर, मंगरूळपीर तहसीलदार रवी राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालखी मार्गावरील आरोग्य शिबिरे, स्वच्छता, निवास व्यवस्था, वाहतूक नियंत्रण यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.