विदर्भ राज्य आंदोलन समितीचा “विदर्भ राज्य निर्माण मेळावा” दिनांक ०७ जून रोजी भंडारा येथे

0
15

गोंदिया:- विदर्भाचे स्वतंत्र राज्य मिळविणारच हे उद्दिष्ट ध्येय डोळ्यापुढे ठेवून वि.रा.आं. स. ने पूर्व विदर्भाचा “वेगळे विदर्भ मेळावा” दिनांक ०७ जून २०२५ रोजी भंडाऱ्यातील “बालाजी लॉन” येथे दुपारी १२ ते ५ या वेळेत आयोजित करण्यात येत आहे.
भंडारा व गोंदिया जिल्हयातील सर्व तालुक्यातील प्रत्येक गाव-खेडयात विदर्भ राज्य निर्मितीचा वणवा पेटविण्याचे हेतूने दोन्ही जिल्हयातील नागरिक, महिला व युवकांचा या आंदोलनात सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया जिल्हयासह सर्व ६४ तालुक्यात, देशात सर्वाधिक कर्जात बुडालेल्या व दिवाळखोरीकडे वाटचाल असलेल्या महाराष्ट्राची दैनावस्था, चार वर्ष द्वीभाषिक मुंबई राज्यात, त्यानंतर ६५ वर्षे मराठी भाषिकांच्या संयुक्त महाराष्ट्रात राहून विदर्भातील जनतेला नागपूर कराराप्रमाणे लोकसंख्येच्या आधारावर न मिळालेला २३% हक्काचा निधी, परिणामी निधी अभावी अपूर्ण असलेले १३१ सिंचन प्रकल्प, त्यामुळे ओलिताखाली येऊ न शकलेली १४ लाख हेक्टर जमीन, परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कायम सुरु असलेले सत्र व प्रत्यक्षात २० वर्षात ४७ हजार शेतकऱ्यांनी “वऱ्हाड सोन्याची कऱ्हाड” असे गतवैभव असणाऱ्या अमरावती विभागात व गांधी-विनोबांच्या वर्धा जिल्हयात केल्या आहेत. विदर्भाच्या २३% हक्काचा नोकऱ्यांपैकी २ लाख ४७ हजार नोकऱ्यांचा अनुशेष बाकी आहे. या जागा विदर्भातील युवकांच्या हक्काच्या आहेत.

विदर्भात २३ प्रकारच खनिजे आहेत. महाराष्ट्रातील ७० टक्के वीज विदर्भात निर्माण होते. बारमाही वाहणाऱ्या नद्या असून ५४% जंगल असूनही विदर्भात न आलेले उद्योग, परिणामी निर्माण झालेला सोशिओ इकॉनामिक असा नक्षलवादाचा प्रश्न, न वाढलेले दरडोई उत्पन्न, त्यामुळे न वाढलेली क्रयशक्ती, परिणामी आ वासून उभा असलेला कुपोषणाचा प्रश्न, त्यामुळे दरवर्षी होणारे बालमृत्यू व गर्भार माता मृत्यू, ७० टक्के औष्णिक वीज निर्मीतीचा परिणाम म्हणून हवेचे प्रदुषण, त्यामुळे विदर्भाच्या वाटयाला आलेले प्रश्नाचे गंभीर आजार, बेरोजगारी आणि नोकरीच्या निमित्ताने झालेले स्थलांतर, याचा परिणाम म्हणून कमी झालेले विदर्भाचे ४ आमदार व एक खासदार, अशा सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे, ते म्हणजे “विदर्भाचे वेगळे राज्य !” केंद्र सरकारने राज्य घटनेतील अनुच्छेद तीन नुसार विदर्भाचे वेगळे राज्य त्वरीत निर्माण करावे आणि विदर्भ राज्याच १२० वर्षापासूनची असलेली मागणी कायमसाठी निकालात काढावी. हा संदेश भंडारा व गोंदिया जिल्हयातील गावागावात पोहोचवून, जनजागरण करुन, विदर्भ आंदोलनात समाजातील सर्व घटकांचा सक्रीय सहभाग वाढवून, त्यासाठी पूर्व विदर्भातील जनतेची मानसिकता तयार करण्यासाठी “विदर्भ राज्य निर्माण मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पूर्व विदर्भातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने अतुल सतदेवे (जिल्हा समन्वयक गोंदिया), संजय केवट ( गोंदिया भंडारा विभाग प्रमुख), दादाराव फुंडे (जिल्हाध्यक्ष, गोंदिया), विजय नवखरे (जिल्हाध्यक्ष, भंडारा), संतोष पांडे (वरिष्ठ विदर्भवादी), छैलबिहारी अग्रवाल (को.क. सदस्य) वसंतराव गवळी (गोंदिया शहर समन्वयक), अरुण बन्नाटे (गोंदिया जिल्हाध्यक्ष युवा आघाडी), पंचशिला पानतवने (जिल्हाध्यक्ष म.आ.), दिपा काशिवार (को.क. सदस्य), सुंदरलाल लिल्हारे (को.क. सदस्य), अजय गौर (को. क. सदस्य), व्ही.बी. चौधरी (को.क. सदस्य), भोजराज ठाकरे (उपाध्यक्ष गोंदिया जिल्हा), सी.पी.बिसेन ( जिल्हा महासचिव), यशवंत रामटेके, प्रदीप उजवणे, बाबूराव जनबंधु, वजीर बिसेन, भूपेंद्र पटले, नागेश गौतम, एस.पी.बोरकर, अशोक बनसोड, लालाजी कुचेकर, कमलेश उके, आदि अन्य विदर्भवादी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केले आहे