
गडचिरोली, 5 जून: गडचिरोली जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय उत्पादन वाढवण्यासाठी व राज्यात हा जिल्हा अग्रेसर करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी मत्स्य उत्पादन वाढविण्यासाठी तलावांमधील गाळ काढणे आणि तलाव परिसरातील अतिक्रमणे हटवण्यावर भर दिला.
या बैठकीला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आ. डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, मत्स्य व्यवसाय उपायुक्त सुनील जांभुळे, अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
मंत्री राणे यांनी गडचिरोली जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात मागे असण्याची कारणे जाणून घेतली आणि त्यात वाढ कशी करता येईल यावर विचारणा केली. त्यांनी मत्स्यव्यवसायिक आणि तलावांतील ठेकेदारांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय आणि पाटबंधारे विभागाला दिल्या.
मंत्री राणे यांनी जलसंधारण विभागाला तलावांमधील गाळ काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यास सांगितले. मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यासोबतच, जिल्ह्यात मत्स्य वाढीच्या विविध योजना राबवण्यासाठी जिल्हा नियोजनमध्ये पाच टक्के निधी राखीव ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली.
पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये आदिवासी समुदायासाठी असलेल्या योजनांचा लाभ केवळ त्यांच्यापर्यंतच पोहोचावा आणि इतर कोणीही त्याचा गैरफायदा घेऊ नये, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. गडचिरोली येथे शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही राणे यांनी सांगितले. तसेच, राज्यात मच्छीमारांसाठी आणि मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी नवीन योजना तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त समीर डोंगरे यांनी सादरीकरणाद्वारे गडचिरोली जिल्ह्याची माहिती दिली. यावेळी कृष्णा गजबे, रमेश बारसागडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता अमित राऊत, तसेच नागपूर विभागातील सर्व मत्स्यव्यवसाय उपायुक्त व संबंधित अधिकारी उपस्थित होते.