
नागपूर, दि. 5 जून 2025: “वीज अदृश्य असली तरी तिचे दुर्लक्ष कधीही क्षम्य नसते. विद्युत अपघातात कर्मचाऱ्याचा किंवा कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास, त्यांच्या केवळ वर्तमानाचेच नव्हे, तर पुढील तीन पिढ्यांचे कधीही भरून न येणारे, अपरिमित नुकसान होते. हे भयावह वास्तव लक्षात घेऊन, महावितरणचे प्रत्येक कर्मचारी तसेच राज्यातील प्रत्येक नागरिकाने विद्युत सुरक्षेबाबत सदैव सतर्क राहावे आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे,” असे कळकळीचे आवाहन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी आज केले.
महावितरणच्या गौरवशाली 20 व्या वर्धापनदिनानिमित्त सध्या राज्यभरात सुरू असलेल्या ‘विद्युत सुरक्षा सप्ताहा’चा एक महत्त्वाचा भाग म्हणून, गुरुवारी (दि. 5) प्रकाशभवन, गड्डीगोदाम, नागपूर येथे ‘बाईक रॅली फॉर इलेक्ट्रिकल सेफ्टी’ चे दिमाखदार उद्घाटन राजेंद्र पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते. याप्रसंगी संचालक (ग्राहक व्यवहार) ॲड. गौरी चंद्रायण, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, सिव्हील लाईन्स विभागाचे कार्यकारी अभियंता धम्मदिप फ़ुलझेले यांच्यासह महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनजागृतीच्या या अभिनव उपक्रमात सहभागी होण्यासाठी उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. या बाईक रॅलीत तब्बल 300 अधिकारी व कर्मचारी हातात विद्युत सुरक्षेचे घोषणा फ़लक घेत सहभागी झाले होते. यावेळी ॲड. गौरी चंद्रायण, आणि दिलीप दोडके यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.
संचालक राजेंद्र पवार यांनी यावेळी माहिती दिली की, महावितरणचे दूरदृष्टीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी संपूर्ण राज्यभरात विद्युत सुरक्षेची व्यापक जनजागरण मोहीम सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यांच्याच दूरदृष्टीच्या मार्गदर्शनाखाली ‘शून्य विद्युत अपघाता’चे महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित करून, विद्युत सुरक्षा सप्ताहात विविध माहितीपर व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अत्यंत धकाधकीच्या आणि संवेदनशील सेवा क्षेत्रात कार्यरत असताना, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत विद्युत अपघाताचा धोका निर्माण होणार नाही याची काटेकोरपणे काळजी घ्यावी, असे श्री. पवार यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, त्यांनी नागरिकांना वीजसाक्षर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. यासाठी सातत्याने स्थानिक पातळीवर विविध उपक्रम राबवून नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे आणि त्यांना विजेच्या सुरक्षित वापराबाबत शिक्षित करण्याचे आवाहनही संचालक राजेंद्र पवार यांनी केले.
वसुंधरा दिनानिमित्त ठिकठिकाणी वृक्षारोपण आणि व्यापक जनजागृती रॅली
या सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून, राजेंद्र पवार, ॲड. गौरी चंद्रायण,दिलीप दोडके, अमित परांजपे आणि धम्मदिप फुलझेले यांच्या हस्ते प्रकाशभवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे संवर्धन आणि विजेचा सुरक्षित वापर या दोन्ही महत्त्वाच्या संदेशांचा समन्वय साधण्यात आला. केवळ सिव्हिल लाईन्स विभागापुरती मर्यादित न राहता, महावितरणच्या नागपूर परिमंडलांतर्गत असलेल्या नागपूर व वर्धा जिल्ह्यातील काँग्रेस नगर, महाल, गांधीबाग, बुटीबोरी, मौदा, सावनेर, उमरेड, काटोल, वर्धा, आर्वी आणि हिंगणघाट या सर्व विभागांमध्ये देखील विद्युत सुरक्षा रॅलीच्या माध्यमातून वीज सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. वसुंधरा दिनानिमित्त ठिकठिकाणी वृक्षारोपण करून लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचा सामूहिक निर्धार यावेळी करण्यात आला. या उपक्रमांमुळे विद्युत सुरक्षा आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला.